खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
बेळगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात हे प्राणी संग्रहालाय आहे. या प्राणी संहग्रहालयातील 28 काळविंटाचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर : एकीकडे वन्यजीव (Forest) सुरक्षा हा सरकारच्या आणि वन विभागाच्या अजेंड्यावरील विषय आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात वन्य प्राणी मानवी वस्तीत येत असल्याने मनुष्य आणि वन्य प्राण्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच, पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्त वावर दहशत निर्माण करत असल्याने दिसताच क्षण गोळ्या मारण्याचे आदेश बिबट्यासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे, वन्य जीवांची सुरक्षा सरकार नेमकी कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, आता बेळगाव जवळील राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयातील तब्बल 28 काळविटांचा (Deer) संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकच्या (Belgaon) वनमंत्र्यांनी दिले आहेत.
बेळगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात हे प्राणी संग्रहालाय आहे. या प्राणी संहग्रहालयातील 28 काळविंटाचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत. शनिवारी प्राणी संग्रहालयातील वीस काळविटांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे वन खात्यात देखील खळबळ माजली आहे. नोव्हेंबर 13 रोजी आठ काळविटांचा मृत्यू झाला होता. केवळ तीन दिवसांच्या कालावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याने या मृत काळविटांच्या मृत्यूचे कारण शोधणं हे वन विभागापुढे आव्हान बनलं आहे.
बॅक्ट्येरिया इन्फेक्शन मुळे मृत्यू झाल्याची शंका वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे. असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागराज यांनी प्राणी संग्रहलयाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली. दोन दिवसापूर्वी मृत झालेल्या काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आता शनिवारी मृत झालेल्या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येणार आहे. म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथून पशु वैद्यकीय तज्ज्ञ काळविटांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी येत आहेत. मात्र, अवघ्या तीन दिवसांत 28 काळविटांचा मृत्यू झाल्याने वन्य जीव सुरक्षा हा सरकारसमोरील यक्ष प्रश्न बनला आहे.























