पाचशे एकर जमिनीचा आरोप केला, पण राजेश क्षीरसागर पाच मिनिटही बिंदू चौकात आले नाहीत; क्षीरसागरांच्या नावावर जमीन करण्यासाठी राजू शेट्टींचा दोन तास ठिय्या
Raju Shetti on Rajesh Kshirsagar: दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी जाहीरपणे क्षीरसागर यांना आव्हान देत निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या जमिनीपेक्षा जास्त असल्यास नावावर करण्याचे आव्हान दिले होते.

Raju Shetti on Rajesh Kshirsagar: शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. यानंतर सदरची जमीन राजेश क्षीरसागर यांच्या नावावर करण्यासाठी राजू शेट्टी कार्यकर्त्यांसमवेत भर पावसात जवळपास दोन तास बिंदू चौकात ठाण मांडून बसले. राजेश क्षीरसागर न आल्याने कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्या बक्षिसपत्रावर सह्या करून सदरचे बक्षिसपत्र रात्री-अपरात्री कधीही येवून घेवून जाण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना केले. दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी जाहीरपणे क्षीरसागर यांना आव्हान देत निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या जमिनीपेक्षा जास्त असल्यास नावावर करण्याचे आव्हान दिले होते. क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला. त्यानंतर क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरण पत्राव्यतिरिक्त 500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार असल्याचे केलेल्या आव्हानानुसार वकीलांसह उपस्थित राहून बक्षिसपत्राचे कार्यकर्त्यांच्या साक्षीने वाचन करून त्यावर सह्या केल्या.
मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमीनी बळकावल्या नाहीत
राजू शेट्टी म्हणाले की मी आजपर्यंत पाच निवडणुका लढविल्या, त्या सर्व निवडणुका जनतेच्या लोकवर्गणीतून लढवल्या. मला राज्यभर फिरण्यासाठी दिलेली फॅार्च्युनर गाडीसुध्दा लोकवर्गणीतून देण्यात आली आहे. मला कधी गाडी घेण्यासाठी आयआरबीच्या कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करावे लागले नाही, मी कोणत्या मल्टीस्पेशालिटी दवाखान्याच्या डॅाक्टराकंडून, शहरातील बिल्डराकडून, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील खातेप्रमुखाकडून औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाकडून बगलबच्चांना पाठवून हप्ते गोळा केले नाहीत. महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमीनी बळकावल्या नाहीत यामुळे राजेश क्षीरसागर यांनी माझ्या संपत्तीची कधीही चौकशी करावी असा टोला शेट्टी यांनी लगाविला.
क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणा देवून बिंदू चौक दणाणून सोडला
आज दुपारी 12 वाजता बिंदू चौकात हजर राहणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितल्यानुसार सकाळी 11.45 वाजताच बिंदू चौकात उपस्थित राहिले. दुपारी 12.30 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कानाकोऱ्यातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. शक्तीपीठ महामार्ग विरोधी व राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणा देवून बिंदू चौक दणाणून सोडला. स्वाभिमानीचे आंदोलन असल्याने पोलिस प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, स्वाभिनानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, कॅाम्रेड सम्राट मोरे, सुनील मोदी, सचिन चव्हाण, धनाजी पाटील, राजाराम देसाई, सचिन शिंदे, जयकुमार कोले, पोपट मोरे, संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना व शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या























