एक्स्प्लोर
भारत-पाक सीमेवर लवकरच काँक्रिट भिंत उभारणार

नवी दिल्ली: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन सीमेप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान सीमेवर काँक्रिट भिंत उभारण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री राजनाथ सिंह लवकरच यासंदर्भात घोषणा करणार असल्याचं समजतंय. गृहमंत्री राजनाथ सिंह आज भारत-पाकिस्तान सीमेलगची राज्ये राजस्थान, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ही बैठक होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वतंत्र झाल्यापासून सीमेवरुन वाद आहेत. त्यातच अधून- मधून पाकपुरस्कृत दहशतवादी भारतात घुसखोरी करत असतात. ही घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमा आणखी बळकट करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. यामध्ये काही ठिकाणी जास्त उंचीच्या भिंती बांधल्या जाणार असून, काही ठिकाणी असलेली तारेची कुंपणं आणखी हायटेक केली जाणार आहेत. यामध्ये सेंसर आणि लेझर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. राजनाथ सिंह आज यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे.
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?





















