एक्स्प्लोर
कोण होते अनिल दवे? ज्यांच्या जाण्याने मोदीही हळहळले!

नवी दिल्ली: केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं आज दिल्लीत आकस्मिक निधन झालं. वयाच्या अवघ्या 61 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. काल संध्याकाळपर्यंत पर्यावरण विषयक बैठकांमध्ये ते व्यस्त होते. पण आज सकाळी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी देशाला दिली, तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
मागच्या वर्षी जुलैमध्ये अनिल दवेंनी जेव्हा पर्यावरण खात्याची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा एका सच्चा पर्यावरणप्रेमीकडे हे खातं सोपवून मोदींनी योग्य निवड केल्याचीच प्रतिक्रिया उमटली होती. मंत्रिपदाच्या त्यांच्या कारकिर्दीला अजून एक वर्षही झालं नव्हतं, तोवरच दवे अकस्मात निघून गेलेत. दिल्लीतल्या एम्स हास्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खरंतर काल संध्याकाळपर्यंत ते जीएम मोहरीसंदर्भातल्या बैठकांमध्ये व्यस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पण सकाळी अचानक त्रास होऊ लागल्यानं त्यांना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
मध्यप्रदेशातल्या उज्जैनजवळच्या बाडनगर गावात 6 जुलै 1956 साली त्यांचा जन्म झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा त्यांना त्यांचे आजोबा दादासाहेब दवे यांच्याकडूनच मिळाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रचारक म्हणूनही काम पाहिलं. दवे राजकीय क्षेत्रात पहिल्यांदा चमकले ते 2003 साली. म. प्रदेशात दिग्विजय सिंह यांचं सरकार उलथवून भाजपला सत्ता मिळवून देण्यात एक संघटक म्हणून दवेंची मोठी भूमिका होती.
उमा भारती यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दवेंना सल्लागार म्हणून नेमलं होतं. शिवाय सध्याचे म. प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याही ते अत्यंत जवळचे होते.
पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेल्या अनिल दवेंच्या भोपाळमधल्या घराचं नावही नदी का घर असं होतं. नर्मदा हा त्यांच्या जगण्याचा विषय होता. एक राजकारणी, पर्यावरणप्रेमी याशिवाय त्यांची आणखी एक ओळख होती कमर्शिअल पायलटचं.
पायी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी नदीप्रेमाखातर नर्मदेची हवाई परिक्रमाही स्वता विमान चालवून पूर्ण केली होती. नर्मदा समग्र या त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून नर्मदा संवर्धनासाठी मोठं कामही केलं. मृत्यूनंतर याच नर्मदेच्या काठावर आपला देह विसावा अशी त्यांची इच्छा होती. होशंगाबाद इथल्या बांद्राभान इथे ज्या ठिकाणी नर्मदा महोत्सव होतो, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
2009 पासून सलग दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातून अनिल दवे हे राज्यसभेवर खासदार होते.
दवेंचं एक मराठी कनेक्शन म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर 'शिवाजी और सुराज' नावाचं एक पुस्तकही लिहिलं होतं. छत्रपतींच्या पराक्रमांची चर्चा खूप होते, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्यांना ठळकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला होता. दवेंच्या अकस्मित निधनानं देशानं केवळ मंत्रीच नव्हे, तर एक सच्चा पर्यावरणप्रेमीही गमावलाय.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















