एक्स्प्लोर
या अटींवर सुप्रीम कोर्टाकडून दिवाळीत फटाके वाजवण्यास परवानगी
या दिवाळीत फटाके वाजवता येणार आहेत. सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यास नकार दिला. पण यासाठी कोर्टाकडून काही अटीही घालण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर मोठा निर्णय दिला आहे. कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात यावेत आणि ते फक्त परवानाधारक विक्रेत्यांनीच विकावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. शिवाय फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. ऑनलाईन फटाके विक्रीवरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. केवळ दिवाळीच नाही, तर प्रत्येक सण-उत्सवांसाठी हा नियम लागू असेल, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. जस्टिस एके. सिकरी आणि जस्टिस अशोक भूषण यांनी 28 ऑगस्ट रोजी यावर निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीत होणारं ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण टाळण्यासाठी देशभरात फटाक्यावर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. या प्रकरणातील याचिकाकर्ते अर्जुन गोपाल, आरव भंडारी, झोया भसिन हे तिघेही बाल याचिकाकर्ते होते. तीन ते चार वर्षांची ही मुलं आहेत. त्यांच्यावतीने वकील गोपाल शंकर नारायणन यांनी देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनी सुनावणीच्या दरम्यान दिल्लीतल्या गंगाराम हॉस्पिटलच्या श्वसन विभागाच्या प्रमुखांनाही कोर्टात आणलं होतं. डॉक्टर अरविंद कुमार यांनी कोर्टात अनेक ग्राफिक्स, फोटोग्राफ्ससह याचे दुष्परिणाम दाखवले. फटाक्यांच्या प्रदूषणाचा सर्वात जास्त 28 ते 30 टक्के फटका लहान मुलांना बसतो. आपण आपल्या कारकीर्दीत लहान मुलांची अशी काळवंडलेली फुफ्फुसं पहिल्याचं त्यांनी व्यथित होऊन सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणण्याचा विरोध केला आहे. फटाक्यांसाठी नियम बनवणं हे चांगल पाऊल असेल. पण अॅल्युमिनिअम आणि बेरियम यांचा वापर रोखणं हे चुकीचं आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारकडून सुनावणीवेळी करण्यात आला होता. कोणत्याही संशोधनाशिवाय दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणली गेली. यामुळे अनेकांचा रोजगार गेला. प्रदूषणाला फटाक्यांव्यतिरिक्त इतर गोष्टीही जबाबदार आहेत, असं तामिळनाडू सरकार, फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानेही गेल्या सुनावणीत यावर आपलं मत नोंदवलं होतं. आपण एक व्यापक दृष्टीकोन ठेवत प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी आणायला हवी, की तात्पुरता दृष्टीकोन ठेवत फक्त फटाक्यांवर बंदी आणायला हवी, असा सवाल जस्टिस सिक्री आणि जस्टिस अशोक भूषण यांच्या खंडपीठाने केला होता.
Before You Go
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO

नरेंद्र बंडबे
Opinion




















