VIDEO : पहलगामची जबाबदारी पंडित नेहरु घेणार का? सुरक्षेत चूक, अमित शाहांनी राजीनामा द्यावा; दोनच मिनिटांच्या भाषणात संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On Pahalgam Terrorist Attack : सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली होती. ते जर पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नवी दिल्ली : राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जबरदस्त वार केला. पहलगाम हल्ला हा सुरक्षेच्या चुकीमुळे झाला, त्याची जबाबदारी काय पंडित नेहरु घेणार का? या प्रकरणी अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच सरदार पटेल जर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर त्यांनी आरएसएसवर बंदी घातली असती आणि आज भाजपवाले दिसलेच नसते असा टोला त्यांनी लगावला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांना दोन मिनिटांच्या भाषणाची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "पहलगामच्या वेळी सुरक्षेत चूक झाली हे जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनीही मान्य केलं आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. त्याची जबाबदारी कोण घेणार? त्या हल्ल्याची जबाबदारी पंडित नेहरू घेणार का? पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जण मृत्यूमुखी पडले. त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी राजीनामा द्यावा."
सगळ्या चुका नेहरूच्या नावावर टाकता
संजय राऊत म्हणाले की, हे सरकार भूतकाळात रमणारे आहे, त्यामुळे प्रत्येक चूक ही नेहरुंच्या माथी मारली जाते. पंडित नेहरू त्यांना झोपू देत नाहीत आणि त्यांना जगूही देत नाहीत.
सरदार पटेल असते तर भाजपवाले दिसले नसते
पंडित नेहरुंमुळेच आज भाजपवाले समोर सत्तेत बसले आहेत. भाजपवाल्यांनी नेहरुंचे आभआर मानले पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, "पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले, सरदार पटेल हे पहिले पंतप्रधान बनले नाहीत ही चूकच झाली. सरदार पटेल यांनी पहिल्यांदा आरएसएसवर बंदी घातली होती. जर सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते. त्यांच्यावर बंदी घातली असते."
त्या आधी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांचं संसदेतील भाषण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झाल्यास 'रुदाली' होती. मोदींनी एकदाही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही. ट्रम्प यांचे नाव घ्यायला मोदी घाबरतात असं राऊत म्हणाले.
ही बातमी वाचा:























