Rajasthan Congress: राहुल गांधी यांनीच काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं, राजस्थान काँग्रेस कमिटीकडून प्रस्ताव पारीत
Congress President : राजस्थान काँग्रेस कमिटीनं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे.

Congress President : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची (Congress President) माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन सध्या राजकीय वर्तळात विविध चर्चा सुरु आहेत. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच काँग्रसचे अध्यक्ष व्हावं अशी मागणी काही नेते करत आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आघाडीवर आहेत. राहुल गांधी यांनीचं काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्र हातात घ्यावी, अशी इच्छा गेहलोत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राजस्थान काँग्रेस कमिटीनं राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे.
राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं यासाठीचा प्रस्ताव पारीत करण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष होऊन पक्षाची धुरा सांभाळावी, अशी भावना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे. या मागणीला प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना पाठिंबा दिला आहे. तसेच उपस्थित सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपली बाजूही मांडली.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 400 प्रतिनिधींनी एकमताने ठराव केला मंजूर
बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार, मुख्यमंत्री गेहलोत यांनी राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राजस्थानमधील एआयसीसी प्रतिनिधींची निवड काँग्रेस अध्यक्षांनी करावी असा प्रस्ताव मांडला. याला प्रदेशाध्यक्ष डोटासरा यांनी पाठिंबा दिला तर काँग्रेस कार्यकारिणी सदस्य रघुवीर मीणा यांनी त्यास अनुमोदन दिले. हा ठराव राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व 400 नवनिर्वाचित प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला आहे. हा AICC मध्ये मांडण्यासाठी राज्य निवडणूक अधिकारी राजेंद्र सिंह चंपावत यांच्याकडे सादर केला आहे.
सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु
भारतातील प्रत्येक नागरिकाला जोडण्यासाठी सध्या काँग्रेस पक्षाची राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. 7 सप्टेंबरपासून तामिळनाडूमधून ही यात्रा सुरु केली आहे. जगात प्रेम आणि बंधुता पसरवणे हा या प्रवासाचा उद्देश असल्याचं काँग्रेस (Congress) पक्षाने सांगितलं आहे. म्हणूनच याला भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले आहे. हा प्रवास एकतेची ताकद दाखवण्यासाठी, एकसोबत चालत भारत घडवण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत राहुल गांधींना प्रश्न विचारला होता. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुम्हाला कळेल की मी अध्यक्ष होतोय की नाही असे उत्तर दिले होते. म्हणाले. मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहे, नेतृत्व करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. विरोधकांची एकजूट करण्यावर चर्चा सुरु असल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
