Petrol Diesel Stock : भारताकडे किती दिवसांचा पेट्रोल, डिझेल आणि LPG साठा? मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर केंद्र सरकारचं मोठं स्पष्टीकरण
PM Narendra Modi Appeal On Petrol Diesel : पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर मंत्रिमंडळाच्या गटाची महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPG साठ्याच्या आढावा घेण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचं आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मंत्रिमंडळाच्या गटाच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी देशातील ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत भारताने आवश्यक इंधनाचा पुरेसा साठा करून ठेवला असून पुरवठा साखळी अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं सांगण्यात आलं.
Petrol Diesel Stock in India : भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायू साठा आणि 45 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. याशिवाय देशाचा परकीय चलन साठा सुमारे 703 अब्ज डॉलरच्या मजबूत पातळीवर असल्याचंही सांगण्यात आलं.
Fuel Supply in India : पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नाही
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश असून 150 हून अधिक देशांना पेट्रोलियम उत्पादने निर्यात करतो. देशांतर्गत मागणी पूर्णपणे भागवली जात असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची किंवा इंधन साठवण्याची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं.
PM Modi Fuel Saving Appeal : इंधन बचतीमागील आर्थिक कारणे
पंतप्रधान मोदी यांनी 10 मे रोजी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं, सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा विचार करण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन परकीय चलनाची बचत होईल, असा सरकारचा उद्देश आहे.
Oil Marketing Companies Loss : तेल कंपन्यांचा मोठा आर्थिक भार
सरकारच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीचा भार सामान्य नागरिकांवर पडू नये म्हणून भारतातील तेल विपणन कंपन्या दररोज सुमारे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करत आहेत. पहिल्या तिमाहीत त्यांच्या वसुलीत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचंही सांगण्यात आलं.
Government Appeal : नागरिकांनी घाबरू नये
केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची किंवा अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी संयम बाळगून इंधनाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला






















