Pahalgam Attack: कोकरनागच्या जंगलात भारतीय सैन्याला दहशतवादी दिसले पण, गोळ्याही झाडल्या, पण...
Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन या सगळ्यांना ठार मारले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव.

India Vs Pak Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. लष्कराने आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई वेगाने सुरू केली. पहलगामलगतच्या कोकरनाग जंगलाला (Kokernag Forest) वेढा देण्यात आलाय. या जंगलात दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. जमिनीवरील शोध मोहिमेसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान या जंगलात चार दहशतवाद्यांची (Terrorists) एक टोळी अनेकदा दिसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीयसुरक्षा दलांसह (Indian Army) त्यांची चकमकही झालीय. मात्र, पहलगाममध्ये हल्ला (Pahalgam Attack) करणारे हे तेच दहशतवादी आहेत का, याचा शोध अद्याप लागलेला नाही. भारतीय सैन्याकडून ड्रोनद्वारे कोकरनाग जंगल परिसरात टेहळणी केली जात असून या दहशतवादी टोळीचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सध्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा कसून तपास सुरु आहे. दहशतवादी कुठून आले होते, याची माहिती गोळा केली जात आहे. दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या मार्गाने आले, हल्ल्यानंतर कुठे गेले याचा सध्या कसून तपास सुरू आहे. त्यासाठी बैसरन व्हॅलीत सापडलेली काडतुसांच्या पुंगळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरु आहे. श्रीनगर परिसरात प्रत्येक चौकीवर सुरक्षा दलांकडून नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. कोण कशासाठी आले आहे, ही माहिती विचारली जात आहे. या भागातील हॉटेल्समध्येही सुरक्षा दल आणि पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी सैन्याने सोमवारी रात्री नियंत्रण रेषेलगत अंदाधुंद गोळीबार केला. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडूनही जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले.
भारतीय लष्कर कोणतीही कारवाई करण्यासाठी सज्ज: राजनाथ सिंह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. सुमारे 40 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. कोणतीही कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याचे समजते.
आणखी वाचा
पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली

























