भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे, तंत्रज्ञान मानवाच्या सेवेसाठी असावं : नरेंद्र मोदी
Narendra Modi : देशाची राजधानी नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे.

Narendra Modi on AI Revoulation नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या निमित्तानं तंत्रज्ञान आणि एआय संदर्भात एक मुलाखत दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदी यांनी तंत्रज्ञान हे मनुष्य सेवेसाठी असावं, माणसांची जागा घेण्यासाठी नव्हे, असं म्हटलं. जागतिक विकासाला मानवकेंद्री ठेवत एआयनं प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एआय संदर्भात बोलताना म्हणाले की तंत्रज्ञानाचं अस्तित्व माणसांच्या सेवेसाठी असावं त्यांची जागा घेण्यासाठी नसावं. आमचं व्हिजन स्पष्ट आहे, जागतिक विकासाला एआयनं प्रोत्साहन देताना सखोलपणे मानवकेंद्री असलं पाहिजे. आम्ही फक्त टॅलेंट विकसित करत नसून इन्फ्रास्ट्रक्चर, धोरण यंत्रणा आणि एआय क्रांतीत भारतानं सहभागी व्हाव यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर काम करतोय, असं मोदी म्हणाले.
एआय सुपरपॉवरमध्ये भारत असावा
मोदी पुढं म्हणाले की, आम्हाला आयटी क्षेत्र फक्त सेवा क्षेत्रात नकोय त्यांनी एआय उत्पादनं, एआय प्लॅटफॉर्मसाठी काम करावं, ज्यानं भारत आणि जगाला सोल्यूशन्स मिळतील, असं मोदींनी सांगितलं. माझ्या मते एआय हे ऊर्जा कित्येक पटीनं वाढवणारं असेल ज्यामुळं जितक्या सीमा किंवा मर्यादा असतील त्या दूर करता येतील. माझ्या व्हिजन नुसार भारत जगातील तीन प्रमुख एआय सुपरपॉवर्समध्ये असावा. तो देखील एआयच्या वपारतात नाही तर एआयच्या निर्मितीत, असं मोदींनी म्हटलं. आपल्या एआय मॉडेलचा वापर जगभरात झाला पाहिजे, अब्जावधी लोकांनी त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये वापर करावा. आपल्या एआय स्टार्टअपचं मूल्य शेकडो अब्ज असेल, ज्यातून दशलक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील, असंही मोदींनी म्हटलं.
डिजिटल शतकात आत्मनिर्मभर भारत म्हणजे एआय मध्ये भारतानं आपला स्वत: चा कोड लिहायला हवा. इंडिया एआय मिशन द्वारे आपल्या कोडमधून आपणं आपली मूल्य, आपल्या लोकांची सेवा करु याशिवाय जबाबदार एआय नेतृत्त्व म्हणून जगात भारताचं स्थान असेल. आपलं ध्येय स्पष्ट आहे. मनुष्य केंद्रीत जागतिक विकासाला एआयनं गती दिली पाहिजे, असं मोदी म्हणाले.
जगभरात एआयमुळं दरी वाढण्याची भीती असताना भारत मात्र एआयच्या वापरानं ती दरी कमी करण्याचं काम करेल, असं मोदींनी म्हटलं. भारताकडे बुद्धिमत्ता असून उद्योजकीय ऊर्जा असून त्याद्वारे एआय पॉवरहाऊस होण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आपण एआयचे ग्राहक नाही तर निर्माते असू असं मोदी म्हणाले.
आपल्या प्रत्येक प्रयत्नातून आपल्या बुद्धिमान तरुणांनी एआयचा वापर ऊर्जेचा त्यांच्या शक्तीची क्षमता वाढवण्यासाठी करावा. ज्यामध्ये नाविन्यता आणि सर्वसमावेशकता असावी, असं मोदी म्हणाले. एआयमुळं मानवी क्षमता वाढतील. मानवकेंद्रीत निर्णय घेण्याची जबाबदारी देखील वाढेल, असं मोदींनी म्हटलं. एआयमधील सर्वसामान्य मूल्य आणि दर्जा सांभाळण्यासाठी जगानं एकत्र काम केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.
तंत्रज्ञानामुळं काम पुसलं जाऊ नये. त्याचं स्वरुप बदललं जाईल आणि नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असंही मोदींनी म्हटलं. इतिहासानं आपल्याला शिकवलं आहे, जेव्हा नाविन्यता निर्माण होते, नव्या संधी निर्माण होतात. एआयच्या जगात देखील तेच सत्य आहे. एआय संदर्भात आत्मनिर्भर भारताचा विचार केला असता तीन स्तंभ महत्त्वाचे आहेत. सार्वभौमत्व, सर्वसमावेशकता आणि नाविन्यता असं मोदींनी म्हलं. एआय मध्ये आत्मनिर्भर भारत म्हणजे डिजिटल शतकात भारतानं स्वत:चा कोड लिहिणं होय, असं मोदी म्हणाले.























