Local Circles Survey : मोदींवर विश्वास असणाऱ्यांमध्ये 24 टक्क्यांची घट, चार टक्के लोकांना सुशासनाची आशा
Local Circles Survey : मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील केलेल्या बदलाचे कौतुक अनेक लोक करत असले तरी त्यातील फक्त चार टक्के लोकांनाच यामुळे सुशासन येईल असं वाटतंय.

Local Circles Survey : देशातील 51 टक्के लोकांना असं वाटतंय की मोदींची दुसरी कारकीर्द ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहे. मार्च 2019 मध्ये हीच संख्या 75 टक्के इतकी होती, आता त्यात 24 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून येतंय. देशातील 53 टक्के लोकांना वाटतंय की व्यवस्थेचं बळकटीकरण करणं आणि मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन करणे हे सुशासनासाठी अधिक महत्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील केलेल्या नव्या बदलामुळे सुशासन येईल असं फक्त चार टक्केच लोकांना वाटतंय. लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून या गोष्टी समोर आल्या आहेत.
'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गवर्नेंस' अशी घोषणा देऊन 2014 साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. पंतप्रधान मोदींनी 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर देशात कोरोनाची लाट आली आणि लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
या काळात मोदींना शेतकरी आंदोलन, कोरोनामुळे रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुका, देशातील कोरोना लसीचा असलेला तुटवडा अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं आहे. आता सात वर्षांनंतर, मोदींनी काही मंत्र्यांना बाजूला सारत आपल्या मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी दिली आहे. यावर लोकल सर्कल या एनजीओने अभ्यास करुन एक अहवाल तयार केला आहे.
लोकल सर्कल सर्वेचा हा अहवाल 29 मे रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये असं दिसून येतंय की, या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत देशातील मोदींचे स्थान अढळ होतं. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला हळूहळू तडा जात असल्याचं समोर आलं आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत, म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोंदींचे कौतुक करणाऱ्यांच्या संख्येत 24 टक्क्यांनी घट झाली आहे.
मोदींवरील विश्वासामध्ये 24 टक्क्यांची घट
या सर्व्हेमध्ये जवळपास 70 हजारांहून जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामधील 51 टक्के लोकांना असं वाटतंय की मोदींची दुसरी कारकीर्द ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहे. मार्च 2019 मध्ये हीच संख्या 75 टक्के इतकी होती, आता त्यात 24 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून येतंय. महत्वाचं म्हणजे, उरलेल्या 49 टक्के लोकांना मोदींची कामगिरी ही अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचं मत नोंदवलं आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठे बदल 12 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर 7 मंत्र्यांचे प्रमोशन केलं. त्यामुळे मोदींचे हे नवीन मंत्रिमंडळ 75 जणांचं झालं आहे. मोदींच्या या निर्णयावर लोकल सर्कलने नागरिकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामध्ये देशातील 309 जिल्ह्यांतील 9,618 लोकांचा सहभाग आहे. तसेच यामध्ये 68 टक्के पुरुष आणि 32 टक्के या महिला आहेत.
एकूणातील 53 टक्के लोकांना वाटतंय की सुशासनासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व या गुणांची आवश्यकता आहे. 12 टक्के लोकांना असं वाटतंय की मोदी सरकारने सुशासनासाठी खासगी क्षेत्रातील हुशार लोकांना संधी दिली पाहिजे तर 19 टक्के लोकांना असं वाटतंय की निर्णय प्रक्रियेचे अधिक केंद्रीकरण होणं आवश्यक आहे. त्यातील पाच टक्के लोकांना इतर काही उपायांची अंमलबजावणी करावी असं सांगितलं तर पाच टक्के लोकांना आपली मतं व्यक्त करणे जमलं नाही. इतर पाच टक्के लोकांना असं वाटतंय की या देशात सुशासन येणं शक्यच नाही.
एकूणातील 53 टक्के लोकांना वाटतंय की, सुशासनासाठी मोदी सरकारने व्यवस्थेचे अधिक बळकटीकरण करावं आणि मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन करावं. त्यांच्या प्रत्येक कामाची माहिती लोकांना मिळावी. त्यामुळे देशवासियांना मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याची शक्यता आहे. असं जर झालं नाही तर केवळ मंत्र्यांची संख्याच वाढत जाईल, परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही.
या सर्व्हेतून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे, केवळ नवीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने देशात मोदींना देशात सुशासन आणता येणं शक्य नाही असं बहुसंख्य भारतीय नागरिकांना वाटतंय. कारण यातून फक्त राजकीय फायदाच होऊ शकतो. यातील केवळ 4 टक्के लोकांनाच असं वाटतंय की नवीन मंत्र्यांना संधी दिल्याने काहीतरी चांगलं होऊ शकेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कम्युनिटी असलेली लोकल सर्कल या संस्थेने हा सर्व्हे केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Lambda Variant : डेल्टा नंतर आता 'लॅम्बडा'चा धोका; डेल्टा प्लस पेक्षाही अधिक धोकादायक असण्याची शक्यता
- Wimbledon 2021 : विम्बल्डन 2021 मधील रॉजर फेडररचं आव्हान संपुष्टात; ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं
- शहरी नक्षलवाद प्रकरण : पुणे सत्र न्यायालयाचे आदेशच बेकायदेशीर असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी





















