Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
सद्गुरुंच्या आश्रमात १०५ पोलिसांनी कोयंबतूरच्या ईशा योग केंद्राची झाडाझडती करण्यात आली मुलींना आश्रमात डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर व मद्रास न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई करण्यात आली आहे
Jaggi Vasudev Aashram controversy: जग्गी वासुदेव म्हणजेच सदगुरु यांच्या ईशा फाऊंडेशनच्या कोयंबतूरच्या आश्रमाची पोलिसांकडून मंगळवारी झाडाझडती घेण्यात आली आहे. आपल्या दोन मुलींना आश्रमात डांबून ठेवल्याचा आरोप करत एका व्यक्तीनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ईशा फाऊंडेशनच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनी आपल्या मुलीचा विवाह केला आहे तर इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? असा सवाल करत मद्रास उच्च न्यायालयानं सद्गुरुंवर ताशेरे ओढले आहेत.
यानंतर तमिळनाडूमधील कोयंबतूर येथील ईशा योग केंद्राची मंगळवारी पोलिसांनी झडती घेतली. न्यायालयात हिबियस कॉर्पस याचिका दाखल करून एस. कामराज नामक व्यक्तीने ईशा फाऊंडेशनवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या ४२ व ३९ वर्षांच्या दोन्ही मुली आश्रमात कोंडून ठेवल्याचा ठपका या व्यक्तीनं ठेवला असून त्यांना सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयानं हेतूवर केला सवाल
या प्रकरणावर सोमवारी झालेल्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव यांच्या हेतूवर सवाल उपस्थित केल्याचे दिसले. एक व्यक्ती (जग्गी वासुदेव) ज्यांनी आपल्या मुलीचा विवाह लावून तिला संसारामध्ये स्थिर केले आहे, तो इतरांच्या मुलींना डोक्यावरचे केस काढून सन्यासी जीवन जगायला कसे सांगू शकतो, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. असा खडा सवाल मद्रास उच्च न्यायालयानं केला.
105 पोलिसांनी घेतली आश्रमाची झडती
मद्रास उच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर कोयंबतूरमधील ईशा योग केंद्राची १०५ पोलिसांनी झडती घेतली. मात्र, केंद्रानं ही झडती नसून केवळ चौकशीसाठी पोलीस आल्याचा दावा केलाय. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान गीता आणि लता या दोघीही हजर होत्या. आपल्या मुलींना बळजबरीनं आश्रमात ठेवल्याचं सांगितल्यावर या दोघींनीही आपण स्वत:हून इथं राहत असल्याचं सांगितलय. मात्र, आपल्या उच्चशिक्षित मुलींचा ब्रेनवॉश करण्यात आल्याचा आरोप कामराज यांनी केलाय. आपल्या उच्चशिक्षित मुलींना प्रभावित करून त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आल्याचा आरोप कामराज यांनी केला. त्यानंतर काही जणांना डांबून ठेवल्याचा आणि नातलगांना भेटू देत नसल्याचा आरोप केला असून संस्थेमधील परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
हेही वाचा: