एक्स्प्लोर
चारा घोटाळा : लालूंसह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष
2018 मध्ये म्हणजे पुढील वर्षी 3 जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना शिक्षा सुनावली जाईल.

रांची (झारखंड) : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे, तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला. लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जण दोषी ठरले आहेत, तर जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत. वाचा : चारा घोटाळा नेमका काय आहे? 2018 मध्ये म्हणजे पुढील वर्षी 3 जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना शिक्षा सुनावली जाईल. तोपर्यंत पोलिसांनी लालूंसह इतर दोषींना ताब्यात घेतले असून, त्यांची कोर्टातूनच थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. चारा घोटाळा नेमका काय आहे? चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. 1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत. आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. यात लालूंनी 90 लाख रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे. सर्व खटले एकत्रित चालवण्यास कोर्टाचा नकार चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले होते. चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. सरयू राय हे सध्या झारखंडमधील भाजप सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री आहेत. 2014 साली ते पश्चिम जमशेदपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. चारा घोटाळा बाहेर काढल्याने ते प्रकाशझोतात आले होते. संबंधित बातम्या : चारा घोटाळा : मागासवर्गीय असल्याने न्यायाची आशा : लालू चारा घोटाळ्याचा फैसला, लालूंना शिक्षा की सुटका?
Before You Go
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?






















