Facts: फायर पानमध्ये असं काय असतं ज्यामुळे पानाला आग लागते, मात्र तोंड जळत नाही? जाणून घ्या...
Fire Paan: फायर पानबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल आणि व्हिडिओमध्येही पाहिलं असेल. फायर पान बघताच मनात अनेक विचार येतात, पानाला आग कशी लागते? त्यामुळे तोंड जळतं का? अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं पाहूया.
Fire Paan: भारतात खाण्यासाठी असलेल्या पानाचे शेकडो प्रकार आहेत. भारतात बरेच लोक जेवल्यानंतर पान खातात. आजही नवाबांचे शहर म्हणून ओळख असलेल्या लखनौमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत पान देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाते. बऱ्याच लग्नांमध्ये खाण्याच्या पदार्थांव्यतिरिक्त एक वेगळा स्टॉल लावला जातो जिथे विविध प्रकारचे पान उपलब्ध असतात. पण सध्या फायर पानचा वेगळाच ट्रेंड आहे.
दिल्ली (Delhi) असो की मुंबई (Mumbai) किंवा कोणतेही मोठे शहर, आता या फायर पानचा ट्रेंड (Fire Paan Trend) सर्वत्र पसरत आहे. लोक मोठ्या उत्साहाने हे पान खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, ज्यामध्ये तुम्हाला पानवाला हे पान पेटवून थेट ग्राहकाच्या तोंडात टाकत असल्याचे दिसत असेल. फायर पान पाहिल्यावर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे - फायर पान खाल्ल्यानंतर तोंड जळते का? फायर पान कुठे उपलब्ध असते आणि त्याची किंमत किती? या पानाला आग कशी लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊया...
फायर पानची किंमत नक्की किती असते?
फायर पान सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. लोक या पानाला चांगलीच पसंती दर्शवतायत. हे पान जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, हे फायर पान अनेक ठिकाणी 20 ते 30 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर मोठ्या ठिकाणी गेलात तर हे पान 200 ते 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की लोक इतके महागडे पान का खातात? जे काही मिनिटांत संपूनही जातं. खरं तर भारतातील लोकांना खायच्या पानाचे फार वेड आहे. बरेच जण सध्या ट्रेंडमध्ये असलेलं फायर पान खातात आणि काही लोक हे पान खाण्याचा व्हिडीओ बनवण्यासाठी त्याचा अनुभव घेतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करतात.
फायर पानला आग कशी पकडते?
फायर पानचा शोध गेल्या 10 ते 15 वर्षांत लागला आहे. साध्या पानात जे काही पदार्थ जोडले जातात, त्यासोबत आणखी काही पदार्थ टाकून ही आग निर्माण केली जाते. फायर पानमध्ये लवंग, सुका मेवा आणि साखर यांचे मिश्रण टाकले जाते. या मिश्रणाला लायटरने आग लावल्यास पान आग पकडते आणि लगेच ते पान ग्राहकाच्या तोंडात टाकले जाते. लवंगामुळे पानाला आग पकडली जाते.
फायर पानमुळे तोंड का जळत नाही?
फायर पान हे लवंग (Clove), सुका मेवा, नट्स (Nuts) आणि साखर (Sugar) यांच्या मिश्रणापासून बनवले जाते. या मिश्रणाला लावलेली आग फक्त 2 किंवा 3 सेकंदांपर्यंत राहते. आग लावल्याबरोबर पान तोंडात टाकले जाते आणि पान तोंडात टाकताच ती आग आपोआप विझते. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, फायर पानला तोंडात आग लागत नाही, पान तोंडात टाकताच आग विझली जाते.
हेही वाचा:
Before You Go
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून






















