बुराडी प्रकरण : 11 पाईपमध्ये दडलंय 11 जणांच्या मृत्यूचं रहस्य?
दिल्लीतील बुराडी येथे एकाच भाटिया कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाले. ज्या घरात या 11 जणांना मृत्यू झाला त्या घरात 11 पाईल लावलेले मिळाले. या पाईप्सवरुन अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील बुराडी येथे राहणाऱ्या भाटिया कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत रविवारी मिळाले. या सर्वांच्या मृत्यूप्रकरणी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या 11 जणांचा मृत्यू अंधश्रद्धेतून झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मोक्ष मिळण्यासाठी या सर्वांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दिल्ली पोलीस याप्रकरणी आता जानेगदी बाबाचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस भाटिया कुटुंबीयांचे फोन शोधत आहेत. जेणेकरून या सर्वांचे फोन तपासून पुरावे मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
11 पाईप्समध्ये मृत्यूचं रहस्य?
दिल्लीतील ज्या घरात या 11 जणांना मृत्यू झाला, त्या घरात 11 पाईप लावलेले मिळाले. या पाईप्सवरुन अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. घराच्या बाहेर असलेल्या भिंतीला हे 11 पाईल लावण्यात आले आहेत. या 11 पाईप्समधील सात पाईप खालच्या बाजुला झुकलेले आहेत, तर इतर चार पाईप सरळ आहेत. त्यामुळे या 11 पाईप्सचा नेमका अर्थ काय? हे पाईप इथे का लावले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
भिंतीवर लावण्यात आलेल्या या 11 पाईपमधून पाणीही बाहेर पडत नाही आणि भिंतीवरही पाण्याचे कोणते निशाणही नाहीत. एकाच भिंतीवर 11 पाईप लावण्याचा प्रकार पोलिसांना सामन्य वाटत नाही. पोलिसांनी अंधश्रद्धेच्या अँगलने तपास सुरू केला आहे. मात्र भाटिया कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी पोलिसांचा हा दावा खोडून काढला आहे. काही नातेवाईकांनी या सर्वांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. भाटिया कुटुंबीय सुखी होते त्यामुळे ते आत्महत्या करु शकत नाहीत.
रजिस्टरमध्ये काय लिहिलंय? घरातून एक रजिस्टर मिळालं आहे. या रजिस्टरमध्ये कोणी कसं मरायचं आणि कोणाची मरणाची जागा कुठे असेल, याबाबतचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर मृत्यूसाठी स्टूलचा वापर करु, डोळे बंद करु आणि हात बांधले तर आपल्याला मोक्ष मिळेल, असा उल्लेख या वहीत आहे.
7 महिला, 4 पुरुष मृतांमध्ये भाटिया कुटुंबातील सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. भाटिया कुटुंबीयांच्या काही सदस्यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तर काहींचे मृतदेह जमिनीवर मिळाले. त्यांचे हात-पाय बांधलेले आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. भाटिया कुटुंबाचं बुराडीतील संतनगरमध्ये दोन मजली इमारतीत ग्रॉसरी आणि प्लायवूडचं दुकान होतं.
घटना कशी समजली? भाटिया कुटुंब रोज सकाळी 6 वाजता दुकान उघडत असे, मात्र रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत दुकान बंद होतं. त्यामुळे शेजाऱ्याने दुकान का बंद आहे हे चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरात डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना भाटिया कुटुंबातील अनेक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
संबधित बातम्या
कुणी-कुठे आणि कसं मरायचं, डायरीत नोंद, 11 जणांचा मृत्यू अंधश्रद्धेतून?
खळबळजनक घटनेने दिल्ली हादरली, एकाच घरात 11 मृतदेह
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















