एक्स्प्लोर
पुढच्या दिवाळीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, सुब्रमण्यम स्वामींना विश्वास
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढील दिवाळीपर्यंत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढील दिवाळीपर्यंत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पटनामध्ये आयोजित विराट हिंदुस्थान संगम कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. स्वामी म्हणाले की, “पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्ही सर्व अयोध्येतील राम मंदिरात पुजेसाठी जाऊ शकाल, याचा मला विश्वास वाटतो.” विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी विकासाचा मुद्दा महत्त्वाचा नसून, हिंदुत्वाचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा असल्याच्या कानपिचक्या पंतप्रधान मोदींना दिल्या. शिवाय, मोदी सरकारच्या विकासाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले की, “माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेला विकास जनेतेने नाकारला. मोरारजींनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात साखर 2 रुपये प्रति किलो, आणि तांदूळ 1 रुपये प्रति किलोने उपलब्ध करुन दिलं. तर नरसिंह राव यांच्या कार्यकाळात देशाचा विकासदर 3 वरुन 8 टक्क्यांवर पोहोचला. दुसरीकडे वाजपेयी सरकारने इंडिया शायनिंगचा नारा देत, सहा महिन्यापूर्वीच मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. याचा परिणाम काय झाला? या सर्वांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.” स्वामी पुढे म्हणाले की, “देशात चांगला आर्थिक विकास करणं गरजेचंच आहे. पण ते (निवडणुका जिंकण्यासाठी) पुरेसं नाही. त्यासाठी लोकांच्या भावना जागृत करणं गरजेचं आहे. आणि ते केवळ दोनच गोष्टींतून साध्य होऊ शकतं. एक म्हणजे, जे भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांना, कठोर शासन करणं. आणि दुसरा म्हणजे जे लोक भारतीय मुल्यांवर जीवन जगतात. ज्याला मी हिंदुत्व म्हणतो. त्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणं.”
Before You Go
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून






















