नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायसरने प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसची सहा जणांना लागण झाल्याचं उघड झालं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी तीन जण केरळचे, एक जण दिल्लीतील नोएडा, एकजण आग्र्याचा आणि एकजण तेलंगणा येथील आहे. उत्तर प्रदेशच्या शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या वडिलांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर नोएडातील दोन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आग्रा येथील 13 जणांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाचे बैठक


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना रोखण्याबाबत उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत बैठक घेतली. या बैठकीला एमआरएमएल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग हॉस्पिटल, सफदरजंग हॉस्पिटलसह सर्व दिल्ली महापालिकेच्या हॉस्पिटलचे अधीक्षक, रेल्वे हॉस्पिटलचे अधीक्षक आणि सर्व आरोग्य सेवांचे डीजी उपस्थित राहणार आहे.


कोरोनाबाबत माहितीसाठी हेल्पलाईन नंबर जारी


कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता या संदर्भात कुणाला काहीही माहिती हवी असल्यास राज्य शासनाने हेल्पलाईन सुरू केली आहे. याचा 02026127394 हा राज्य नियंत्रण कक्ष क्रमांक आहे आणि 104 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास शंकांचं निरसन केलं जाणार आहे.


#CoronaVirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतर्फे होर्डिंग्जद्वारे जनजागृती


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधील 65 हजार 621 प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया,जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या 12 देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत 401 प्रवासी आले आहेत.


जगभरात 92 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये चीनमधील 80 हजार 304 रुग्ण आणि इतर जवळपास 72 देशांतील 10 हजार 566 रुग्णांचा समावेश आहे. चीनच्या आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 2946 लोकांचा बळी गेलाय. इतर देशांमध्ये 200 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


कोरोनाचं सावट | राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली, 149 प्रवासी कोरोना निगेटिव्ह


राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कार्यवाही


राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येत आहे. बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.


या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये कोरोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येत आहे. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या

Coronavirus | 'कोरोना व्हायरस' होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? | ABP Majha