![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील, शशी थरुर यांना विश्वास
पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र येतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी व्यक्त केलाय. भाजपला हरवणे हेच सर्व पक्षांचे लक्ष्य असल्याचेही थरुर म्हणालेत.
![भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील, शशी थरुर यांना विश्वास All parties will come together to defeat BJP Says Shashi Tharoor भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील, शशी थरुर यांना विश्वास](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/11/20110956/1-even-our-chhillar-has-become-miss-world-shashi-tharoor-tweets.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशात 2024 ला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांबाबत काँग्रेसचे नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र येतील असा विश्वास शशी थरुर यांनी व्यक्त केलाय. सध्या भाजपविरोधी पक्षांचे लोक वेगवेगळी विधाने करत आहेत, ते भाजपला हरवण्यासाठी एकत्र येतील असे थरुर म्हणाले. कारण, भाजपला हरवणे हेच सर्व पक्षांचे लक्ष्य असल्याचे थरुर म्हणाले.
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुखयमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerje) यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर शशी थरुर यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतलं जाईल असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. मुंबईच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंत त्यांनी हे वक्तव्य केले होते. फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणं अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होते. यावर थरुर यांनी भाजप विरोधातील सर्व पक्ष एकत्र येतील असे म्हटले आहे.
देशात स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जातोय
'प्राइड, प्रेजुडिस एंड पंडित्री' या शशी थरुर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ची खिल्ली उडवली. तसेच त्यांच्यावर जोरदार निशाणा देखील लगावला. देशात गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब असून, सुशासनाची जागा ही घोषणा आणि प्रतीकात्मकतेच्या राजकारणाने घेतली आहे. तसेच देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचा आरोपही थरुर यांनी यावेळी केला.
राजकारणात एक आठवड्याचा कालावधीही खूप मोठा असतो. पुढील लोकसभा निवडणुकीला अजून अडीच वर्षांचा काळ बाकी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आवाजात बोलणारे लोक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. केवळ भाजपचा पराभवच नाही, तर त्यांची धोरणे आणि राजकारण हेही ध्येय असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)