देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
भागीरथपुरा परिसरात दूषित पाण्याने बाधित 162 लोक रुग्णालयात दाखल आहेत. एकूण 1400 लोक संक्रमित आहेत. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2456 संशयित रुग्णांची ओळख पटली आहे.

Contaminated Water in Indore: देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरमधील भागीरथपुरा येथे आतापर्यंत 14 जणांचा दूषित पाणी पिण्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्या, भागीरथपुरा परिसरात दूषित पाण्याने बाधित 162 लोक रुग्णालयात दाखल आहेत. एकूण 1400 लोक संक्रमित आहेत. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2456 संशयित रुग्णांची ओळख पटली आहे, ज्यांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले. गुरुवारी सकाळी मंत्री कैलाश विजयवर्गीय हे भागीरथपुरा परिसरात पोहोचले आणि त्यांनी सात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे धनादेश वाटप केले. कुटुंबियांनी मंत्र्यांच्या उपस्थितीत नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, "आम्हाला तुमचे धनादेश नको आहेत." मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव बुधवारी संध्याकाळी इंदूर येथे पोहोचले. त्यांनी विविध रुग्णालयांना भेटी दिल्या आणि आजारी लोकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, "अशी त्रासदायक परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवू नये. यासाठी तुम्ही सर्वांनी व्यापक व्यवस्था करण्यासाठी काम करावे." जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईबाबत ते म्हणाले की, "अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."
'चल फुकटचे क्षुल्लक प्रश्न विचारू नको'
मंत्री कैलाश विजयवर्गीय बैठकीतून बाहेर पडले आणि माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळत नसल्याबद्दल विजयवर्गीय यांचा चांगला पारा चढला आणि म्हणाले, चल फुकटचे क्षुल्लक प्रश्न विचारू नको, घंटा प्रश्न विचारु नको. यावेळी कैलास विजयवर्गीय यांच्या भाषेचा स्तर पाहून पत्रकारानं अत्यंत निर्भिडपणे उद्धट आणि बेतालपणे उत्तर देणाऱ्या विजयवर्गीय यांना जागेवरच फटकारलं. हा क्षुल्लक प्रश्न नाही. घंटा कसलं म्हणत आहात, भाषा जपून वापरा' अशा शब्दात सुनावताच कैलास विजयवर्गीय यांनी काढता पाय घेतला. काही वेळानंतर त्यांनी X वर पोस्ट करून त्यांच्या शब्दांबद्दल खेद व्यक्त केला.
देश के सबसे साफ शहर में गंदा पानी पीने से 10 से ज्यादा लोगों की मौत हो चुकी है जिस शख्स पर लोगों को साफ पानी पिलाने का जिम्मा है वो सवालों को फोकट बता रहे हैं हमारे सवालों को "घंटे" में उड़ा रहे हैं @manishdekoder @GargiRawat @Abhinav_Pan @sanket pic.twitter.com/5iIF2AiFZ7
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) December 31, 2025
काँग्रेसने विजयवर्गीयांच्या राजीनाम्याची मागणी केली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करून X वर लिहिले, मुख्यमंत्री साहेब, तुमचे सरकार आणि तुमचे मंत्री हे काय नाटक करत आहेत? पीडितांना मोफत उपचार मिळत नाहीत आणि सहानुभूतीही मिळत नाही आणि त्याशिवाय, तुमचे अहंकारी मंत्री अपशब्द वापरत आहेत. जर तुमच्याकडे थोडीही लाज शिल्लक असेल तर नैतिकतेच्या आधारावर अशा बेशिस्त मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा द्या."
उच्च न्यायालयाने अहवाल मागवला
दरम्यान, भागीरथपुरात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एक याचिका इंदूर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष रितेश इन्सानी यांनी दाखल केली होती, तर दुसरी याचिका भागीरथपुरा येथील रहिवासी राहुल गायकवाड यांनी दाखल केली होती. बुधवारी उच्च न्यायालयाने दोन्ही याचिकांवर संयुक्त सुनावणी घेतली. ज्येष्ठ वकील अभिनव धनोटकर आणि ऋषी कुमार चौकसे यांनी याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की परिसरातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि मृतांचा आकडा वाढत आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की भागीरथपुरा येथील सर्व रुग्णांवर इंदूरमधील 10 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जात आहेत. न्यायालयाने उत्तर दिले, "हे करायला हवे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल 2 जानेवारी रोजी सादर करा, ज्यामध्ये किती रुग्णांवर उपचार झाले आहेत आणि किती मृत्यू झाले आहेत याची माहिती असेल."
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















