![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Hingoli Rain Update : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात
Hingoli Rain Update : शेंगा लागलेलं सोयाबीन, बोंड लागलेलं कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत.
![Hingoli Rain Update : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात Heavy rain in Hingoli Loss of crops Farmers in trouble Hingoli Rain Update : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/90e20fa976721696a70a0d79a19c29b91695798823501737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hingoli Rain Update : मंगळवारी हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी सावंत, हापसापुर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांना सुद्धा पावसाचा फटका बसला आहे. अगोदरच पावसाळा (Rain) एक महिना उशिराने सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात पावसाचा लहरीपणामुळे शेतातील उभी पिकं करपून जात असताना मंगळवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेलं आहे. शेंगा लागलेलं सोयाबीन, बोंड लागलेलं कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत.
मंगळवारी वसमत तालुक्यात झालेला पाऊस इतका मोठ्या प्रमाणात आला की, आजही अनेक ठिकाणच्या शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेला आहे. यातील अनेक पिकं अगदी काही दिवसांच्या काढणीवर आले होती. परंतु, त्यापूर्वीच अशा पद्धतीने पाऊस झाल्याने उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वसमत तालुक्यातील शेकडो एकरवरील पिकांचे अशाच पद्धतीने नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून, सरकारने मदतीची घोषणा करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांना विमा मंजूर करून नुकसानभरपाई देण्याची सुद्धा मागणी होत आहे.
गावात शिरलं पाणी..
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या, नाल्यांना पुर आल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी तर थेट गावात पाणी घुसल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. वसमत तालुक्यात बळेगाव, तसेच अन्य एका गावात गावालगत असलेल्या नाल्याचे पाणी शिरल्याने काही वेळ गावकऱ्यात खळबळ उडाली होती. मात्र, पावसाचा वेग कमी झाल्याने नंतर हळूहळू पाणी देखील ओसरत गेले. तर, दुसरीकडे हिंगोली शहरातील औंढा रोडवर असलेल्या संभाजी विद्यामंदिर परिसरात पावसाचे पाणी साचले होते. शिवाय शहरातील नामांकित म्हणून ओळखला जाणारा एनटीसी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्रास झाला. काही शासकीय, निमशासकीय कार्यालयातही पावसाचे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक सुरु
गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये देखील पाण्याची वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सिद्धेश्वर धरणात 2.728 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत धरणामध्ये 72.10 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. धरणाच्या वरच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून अधून-मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)