ABP Majha Impact : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उपराजधानीच्या तिखाडी गावात पोहचली एसटी बस; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या लढ्याला यश!
Nagpur News : जेव्हा अनेक वर्षांच्या मागणीनंतर गावात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदा बस पोहोचते आणि गावातील भगिनींच्या (महिलांच्या) या संघर्षात एबीपी माझा त्यांचा अत्यंत विश्वासाचा बंधू ठरलाय.

Nagpur News : जेव्हा अनेक वर्षांच्या मागणीनंतर गावात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदा बस पोहोचते आणि गावातील भगिनींच्या (महिलांच्या) या संघर्षात एबीपी माझा त्यांचा अत्यंत विश्वासाचा बंधू ठरतो. होय नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील तिखाडी गावात आज अनेक वर्षांच्या मागणीनंतर पहिल्यांदा एसटी (ST Bus) पोहोचली. आणि गावातील भगिनिनी आनंद व्यक्त करत एसटीसाठीच्या त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षात त्यांचा बंधू ठरलेल्या एबीपी माझाच्या प्रयत्नांबद्दल मनापासून आभार मानलेत. तिखाडी, उमरा, दुधा हे गाव चांपा आणि खापरी या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही काही अंतरावर वसलेले गाव. मात्र, या गावांमध्ये आजवर कधीच बस पोहोचली नव्हती. त्यामुळे इथले गावकरी चांपा खापरी रस्त्यावर जाऊन बस पकडायचे.
मात्र, गेले काही महिने खनिज आणि अवैध मुरूम उत्खननाच्या शेकडो ट्रक्समुळे चांपा - खापरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. परिणामी त्या रस्त्यावरील बस वाहतूकही बंद झाली होती. आणि त्या रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या तिखाडी, उमरा, दुधा गावांची अडचण आणखी वाढली होती.
.......आणि पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली
दरम्यान, 6 जून रोजी एबीपी माझाने या रस्त्यावर एसटी धावत नसल्यामुळे डझनभर गावातील महिलांना एकतर कित्येक किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय किंवा स्वतःची सुरक्षिततेला धोक्यात घालून ट्रक चालकांसोबत ट्रकमध्ये बसून प्रवास करावा लागत असल्याचं कटू वास्तव दाखवलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही चांपा ते खापरी दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देण्याची आणि दिवाळीनंतर त्याचे काम सुरू करण्याची घोषणा केली होती. एसटी प्रशासनानेही समस्येकडे लक्ष घातले होते आणि आजवर कधीच एसटी बस न पोहोचलेल्या तिखाडी, दुधा, उमरा या गावात आज पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली.
एबीपी माझाचा बातमीचा एक वेगळा इम्पॅक्ट
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा गावात बस पोहोचली, तेव्हा स्वाभाविकरित्या गावकऱ्यांनी बसचे स्वागत तर केलेच. प्रशासनाचे धन्यवादही मानले. मात्र 6 जून रोजी एसटी बस विना डझनभर गावांची होत असलेली अडचण जगासमोर आणून या पंचक्रोशीतील शेकडो महिला व भगिनींची व्यथा समोर आणणाऱ्या एबीपी माझाचे आभार मानायला इथल्या भगिनी विसरल्या नाही. त्यामुळे एबीपी माझाचा एक वेगळा इम्पॅक्ट तर दिसून आलाच सोबतच सामान्यांच्या प्रश्र्नांबद्दल एबीपी माझाची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध झाली.
हेदेखील वाचा























