स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत खोटी पोस्ट, माझाचं ग्राफिक्स वापरुन चुकीची माहिती पसरवल्यामुळे तक्रार दाखल
शरद पवारांच्या दबावामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका बंद होत असल्याबाबत चुकीची माहिती प्रसारीत झाली. याबाबत स्वत: खुलासा डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे तर ‘एबीपी माझा’ नावे तशी खोटी बातमी पसरविल्याप्रकरणी देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान शरद पवारांनी कधीही मालिकेसंबंधात सूचना केलेल्या नाहीत. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही ते म्हणाले. डॉ. कोल्हे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आली की, गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे अनेक पोस्ट्स सोशल मीडिया वर फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालिका रोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असताना मालिकेच्या आशयाबद्दल चुकीची माहिती पसरवणे दुर्दैवी आहे! प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे परंतु मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही.@MumbaiPolice अक्षय देहनकर हा व्यक्ती एबीपी माझाचा लोगो, इमेजेस फोटोशॉप करुन बनावट तसेच समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर अर्थात 'फेक न्यूज' प्रसारीत करत आहे.अशी कुठलीही बातमी 'माझा'ने प्रसारीत केली नाही.त्यामुळे या व्यक्तीवर तातडीनं कारवाई करावी ही विनंती.@CMOMaharashtra #FakeNews https://t.co/jMh6XT5EBR
— ABP माझा (@abpmajhatv) February 5, 2020
अर्धवट चुकीच्या माहितीच्या आधारे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट्स फिरत आहेत. या पोस्ट्स सोशल मिडियावर पसरविणाऱ्यांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरूर टिप्पणी करावी.. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू आहे याची नोंद घ्यावी! pic.twitter.com/0TL6ea6913
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020
























