![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बुलढाण्यातून स्वतंत्रच लढणार, रविकांत तुपकर ठाम; म्हणाले, राजू शेट्टी ऐनवेळी कोणाशीही युती करतात अन् बळी आमचा जातो
शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय आहे की मी स्वतंत्र लढावे म्हणून मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.
![बुलढाण्यातून स्वतंत्रच लढणार, रविकांत तुपकर ठाम; म्हणाले, राजू शेट्टी ऐनवेळी कोणाशीही युती करतात अन् बळी आमचा जातो Ravikant Tupkar Is Firm on His Decision to Fight Independently in Buldhana Raju Shetti Marathi News बुलढाण्यातून स्वतंत्रच लढणार, रविकांत तुपकर ठाम; म्हणाले, राजू शेट्टी ऐनवेळी कोणाशीही युती करतात अन् बळी आमचा जातो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/02/75c06fb24804a7358077fc55ec15d371170416660897489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलढाणा : बुलढाण्यात (Buldhana News) स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) ठाम आहेत. राजू शेट्टी (Raju Shetti) ऐनवेळी कोणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्या सारख्यांचा बळी जातो, असे म्हणत तुपकरांनी निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून (Buldha Lok Sabha Election) निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे
रविकांत तुपकर म्हणाले, दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्र लढण्याची घोषणा करते. मात्र नंतर मग कुठेतरी कोणासोबत युती होते आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो. गेल्यावेळी ही राजू शेट्टींनी मला बुलढाणा लोकसभेसाठी तयारी करायला लावली मात्र ऐन वेळेवर त्यांची युती भाजप सोबत झाली आणि मला मग माघार घ्यावी लागली. त्यांनी त्यावेळी सांगितलं तुम्ही अपक्ष लढू नका हा संघटनेचा निर्णय आहे आणि मी तो मानला. त्यामुळे प्रत्येक वेळेस स्वतंत्र लढण्याची घोषणा होते आणि वेळेवर कुणासोबत तरी युती होते. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय आहे की मी स्वतंत्र लढावे म्हणून मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे.
राजू शेट्टी यांचा हात धरून रविकांत तुपकर हे शेतकरी आंदोलनात आले. मागील 20 वर्षांपासून तुपकर हे राजू शेट्टींसोबत आहेत. अगदी रस्त्यावरच्या आंदोलनापासून तर थेट मंत्रालयावर मोर्चा काढणे आदी आंदोलने-मोर्चे त्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे मूळ हे दिल्लीत असल्याने त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय तुपकर यांनी घेतला आहे.
तुपकरांकडून आंदोलन
मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही तुपकर यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी तुपकरांनी समृद्धी मार्गावरून वाहनांच्या ताफ्यासह नागपुरात प्रवेश केला होता.
शेट्टी आणि तुपकरांमध्ये मतभेद?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी रविकांत तुपकर यांच्या एल्गार रथयात्रा वा मोर्चात कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक वा राजू शेट्टी यांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तुपकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याचेही म्हटले जात होते.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)