एक्स्प्लोर
परप्रांतियांच्या विरोधातली भूमिका सोडली तरच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात विचार : चंद्रकांत पाटील
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र ही भूमिका स्पष्ट करण्याआधीच भाजपकडून मनसेला सोबत घेण्यासंबंधीचे संकेत दिले जाऊ लागले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

मुंबई : मनसे अधिवेशनात राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र त्यापूर्वी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी परप्रांतियांच्या विरोधातली भूमिका सोडली तरच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात विचार केला जाईल अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. मनसेनं आज अनेक ठराव मांडले. मात्र परप्रांतियांसंदर्भातल्या भूमिकेवर मनसेनं भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सत्तेच्या खुर्चीसाठी ते एकत्र येऊ शकतात तर सत्यासाठी आम्ही का एकत्र येऊ शकत नाही? असं म्हणत मनसेसोबत युतीचे संकेत दिले होते. याविषयी एबीपी माझाशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले होते की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. आम्ही सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही. मनसेच्या भूमिकेचं स्वागत करताना शिवसेनेवर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली होती. मुनगुंटीवार म्हणाले की, विचारामध्ये जेव्हा समानता असते तेव्हा युती होते. शिवसेनेबरोबर आमची युती होती तेव्हा आमच्या विचारामध्ये युती होती मात्र शिवसेनेला सत्तेसाठी काँग्रेसची विचारधारा जवळची वाटायला लागली त्यामुळे ते आमच्यापासून दूर झाले. आता मनसेने देशहित, राष्ट्रहिताचा निर्णय केला आहे. त्यामुळे जे जे समविचारी पक्ष आहेत त्यांना एकत्र येण्यासाठी कुठेही अडचण नसते. मनसेने आज जो भगवा रंग स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला नक्कीच नुकसान होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले होते. ते म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रभक्तीची जी जिद्द होती. ती आज बदलून राष्ट्रहितापेक्षा स्वहित, देशहितापेक्षा खुर्ची हित असे दृश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे निश्चित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रध्दा ठेवणाऱ्यांच्या मनात द्वंद सुरु असेल. त्यामुळे अशांसाठी मनसे एक व्यासपीठ म्हणून पुढे आलेली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर जोरदार टीका केली. परंतु त्याआधी त्यांनी कौतुकही केलं होतं ते कसं विसरता येईल. मात्र शिवसेनेने जेवढी टीका सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यावर केली तेवढी टीका तर जगात कोणी केली नसेल. शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी जर सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र येऊ शकतात तर आम्ही भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणत सत्तेपेक्षा सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























