... अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
Sanjay Sawkare : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक झाली नसल्याबाबत संजय सावकारे यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना त्यांनी धक्कादायक वक्तव्य केलं.

भंडारा : पुण्यातील स्वारगेट बसस्थानाकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नाही काय सांगाल असं विचारलं असता महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी धक्कादायक उत्तर दिलं आहे. ते गुरुवारी (27 फेब्रुवारी 2025) रोजी बोलत होते. दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं देखील एक वक्तव्य असंवेदनशील असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.
संजय सावकारे काय म्हणाले?
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बसमध्ये अत्यावर घडला. आरोपी अद्याप अटकेत नाही, असा प्रश्न संजय सावकारे यांना विचारण्यात आला होता. महायुती सरकारमधील वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी या घटनेबाबत असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले,असं म्हणता येत नाही एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर घटना घडत असतात, कारवाई सातत्यानं चालू राहते. महिला असो की पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत. फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, पुरुष नको असं नाही.सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत या दृष्टीनं कुठलंही शासन प्रयत्न करत असते. गुन्हेगार वृत्ती कुठेना कुठे प्रत्येक ठिकाणी असते, गुन्हेगार असल्यानं या गोष्टी घडत असतात, शासन कारवाई करण्याचं काम करत असते, असं संजय सावकारे म्हणाले.
योगेश कदम यांच्या वक्तव्यानं देखील वाद
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानं देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परवाच्या दिवशी जी घटना घडली, ती घटना कुठलिही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळं, तिथं ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तिथं दहा ते पंधरा लोकं बसच्या आजू बाजूला देखील उपस्थित होते. कुणालाही शंका आली नाही, त्यामुळं कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं, अन्य माहिती आरोपी ताब्यात येईल तेव्हा माहिती होईल, असं योगेश कदम म्हणाले.
सुषमा अंधारे यांची कदमांवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकार दरबारच्या मंत्रिपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि असंवेदनशीलपणे व्यक्त होत असेल तर महाराष्ट्रातील या सगळ्या लेकी बाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील. न्याय मिळण्याऐवजी अशा प्रकारे प्रताडित आणि अपमानित केलं जात असेल आणि त्यांच्यावर शंका कुशंका व्यक्त केल्या जात असतील तर न्याय मागण्याऐवजी लेकीबाळी जिवाचं बरं वाईट करणं पसंत करतील, योगेश कदम जरा बरे व्हा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
इतर बातम्या :























