Pankaja Munde : परळी राष्ट्रवादीला गेला, त्यामुळे आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल: पंकजा मुंडे
Pankaja Munde Beed Speech : मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे असं वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

बीड : परळी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला गेला आहे, तर आष्टी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे आष्टीवर यापुढे मला जास्त प्रेम करावं लागेल असं वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, कोणत्याही गुंडाला घाबरत नाही असंही त्या म्हणाल्या. पाटोडा येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे, कुणाची मिंधी नाही. जोपर्यंत लोकांना मी हवे आहे तोपर्यंत मी काम करत राहणार. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेन. परळी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला गेला आहे. तर आष्टी हा भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे यापुढे आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल."
कोयत्यांना धार देण्यासाठी कायम पाठीशी
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या लोकांनी ऊस तोडू नये असं मला हृदयातून वाटतं. मात्र यांची पुढची पिढी आता ऊस तोडणार नाही. ऊसतोड कामगारांसाठी ही पंकजाताई नेहमी उभी राहील. कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील. हा वाक्यप्रचार अर्थ आहे. नाहीतर तुम्ही लगेच काहीही अर्थ लावता.
नवीन पक्ष कशाला काढू?
स्वतंत्र पक्ष स्थापनेवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कशामुळे पक्ष नवीन स्थापन करेन? दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेन?
मेहनत न मिळवलेल्या पैशाने मस्ती येत असते. मेहनत केलेल्या पैशाने मस्ती येत नाही. दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या बनून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "राजकारणामध्ये आणि धर्म कारणांमध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं असलं पाहिजे, पण तेवढीच वृत्ती पण असली पाहिजे. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालत असते. बीड जिल्ह्यातले 25 ते 50 हजार लोक कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारून आलेत. म्हणजे पुढचे पाप करायला मोकळे झालेत का? भगवानबाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला साक्षात भगवानबाबाचे दर्शन होतं. मी स्वतः भगवान बाबा पाहिले नाहीत, मात्र अनेक गोष्टी ऐकल्या आहेत."
मंत्री असले किंवा नसले तरी फरक नाही
मला मंत्री झाले काय आणि नाही झाले काय याचा काही फरक पडत नाही, एवढे प्रेम तुम्ही करता. पण मंत्रिपदामुळे अधिकार येतात. आता 1825 दिवस आहेत माझ्या मंत्रिपदाचे. वरचे 225 दिवस असेच जातात. माझ्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचं काम करेन.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report






















