Sangamner News : साखर कारखाना (Sugar Factory) म्हटलं की उसापासून साखरेची निर्मिती हे आपण वर्षानुवर्ष पाहतोय. गेल्या काही वर्षांपासून साखरे बरोबर अल्कोहोल आणि इथेनॉलची निर्मिती सुद्धा अनेक ठिकाणी केली जाते. मात्र आता साखर निर्मितीबरोबर सोलर पॅनल लावत वीज निर्मिती करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. संगमनेर तालुक्यातील (Sangamner) भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने. दररोज 9 हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग यशस्वीपणे सुरू झाला आहे. 


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सहकारी संस्थांवर यशस्वीपणे कारभार केला आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचाही त्यांचा प्रयत्न राहिला असून साखर निर्मिती बरोबरच इथेनॉल निर्मिती सुद्धा या कारखान्याने सुरू केली होती. मात्र आता शासनाने परवानगी दिल्यानंतर साखर निर्मिती बरोबर वीज निर्मिती करण्याचा सुद्धा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला. काही दिवसांपूर्वीच सोलर पॅनल बसवत सोलर द्वारे वीज निर्मितीचा (Power Generation) हा प्रयोग यशस्वीपणे सुरू झाला आहे. थोरात कारखान्याने 750 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला असून त्यातून दररोज साधारण नऊ हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे.  


यापूर्वीही बगॅसच्या माध्यमातून उभारलेल्या पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमता आणि 30 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प हा यशस्वीपणे कार्यरत असून तो इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे. उसाचे गाळप बंद असताना निर्माण झालेली वीज महावितरणला विकली जाणार असल्याची माहिती थोरात कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहळ यांनी दिली.राज्यातील कारखाने आतापर्यत साखर निर्मितीमधून सुरू होती. मात्र भविष्यात साखर निर्मितीपेक्षा इतर माध्यमातून उत्पन्नात अधिक भर होईल, अशी अपेक्षा ओहळ यांनी बोलून दाखवली आहे. 


इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक 


अनेक सहकारी साखर कारखाने आज तोट्यात असून अनेक कारखाना समोर आर्थिक संकट सुद्धा उभ असत. मात्र योग्य नियोजन आणि योग्य व्यवस्थापन असेल तर सहकारी साखर कारखाना सुद्धा प्रगती करू शकतो. नव्याने उभारलेल्या 5500 मे. टन क्षमता व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प हा यशस्वीपणे कार्यरत असून तोदेखील साखर कारखानदारीत इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे. संगमनेरच्या सहकारी साखर कारखान्याने हे सिद्ध केले असून भविष्यात अशाच पद्धतीने सर्व कारखान्यांनी योजना प्रभावीपणे राबवल्या तर साखर कारखानदारीला गतवैभव प्राप्त होईल याच शंका नाही. 


 


इतर संबंधित बातम्या : 


Ahmednagar : नगर जिल्ह्यात ऊस उत्पादकांचे 190 कोटी थकित, साखर कारखाने पैसे कधी देणार?