सूरज चव्हाणच्या लग्नात एवढी गर्दी की 4-5 बॉडीगार्ड पडले बेशुद्ध,जान्हवी किल्लेकरचा खुलासा
आता एका मुलाखतीत तिने त्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या आहेत.अशावेळी ती त्याच्या सोबत असल्याचं तिने स्पष्ट केलं.

Janhavi Killekar on Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) नोव्हेंबर 2025 मध्ये विवाहबद्ध झाला. या सोहळ्याला जान्हवी किल्लेकरही ( उपस्थित होती. लग्नावेळी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे विधी वेळेवर पार पडत नव्हते. त्यावेळी जान्हवीचा संताप अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता एका मुलाखतीत तिने त्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
सूरजने तब्बल 50 सुरक्षा रक्षक नेमलेले..
राजश्री मराठीशी बोलताना जान्हवी म्हणाली की, सूरजच्या लग्नात तिला खूप मजा आली. महाराष्ट्रात विविध परंपरा पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणच्या रितीरिवाजांनी ती प्रभावित झाली. लग्नासाठी तिने खास तयारी केली होती. स्वतःचे इतर कार्यक्रम रद्द करून ती या सोहळ्याला गेलेली. कारण सूरज तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. तो साधा आणि भावनिक स्वभावाचा असल्याचं सांगत तिने नमूद केलं की, लग्नाला सगळे येतील अशी त्याची अपेक्षा होती. मात्र काही जणांना वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहता आलं नाही, याचं त्याला वाईट वाटलं होतं. अशावेळी ती त्याच्या सोबत असल्याचं तिने स्पष्ट केलं.
गर्दीबाबत बोलताना जान्हवीने सांगितलं की, सूरजने तब्बल 50 सुरक्षा रक्षक नेमले होते. तरीही एवढी लोकसंख्या जमली की त्यापैकी 4-5 जणांना चक्कर येऊन ते खाली पडले. लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर झाल्याने आणि बिग बॉसची टीम येणार असल्याच्या चर्चेमुळे मोठी गर्दी झाली. परिस्थिती अशी होती की, स्टेजवर आणि सभोवती लोकच लोक होते. संध्याकाळी साडेपाचला ठरलेलं लग्न रात्री आठपर्यंतही सुरू झालं नव्हतं. तिला रात्री नऊ वाजता दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्याने तिने व्यवस्थापनाशी बोलणी केली. तिच्या हस्तक्षेपानंतर काही मिनिटांतच विवाहविधी सुरू झाल्याचं तिने सांगितलं.
सुरजला खूप वाईट वाटलं...
"सूरज खूप साधाभोळा आहे. त्याला खरंच वाटत होतं की त्याच्या लग्नाला खरंच सगळे येतील. तो मला सतत सांगत होता जान्हवी हे येणार आहेत, तो येणार आहे आणि शेवटपर्यंत मी त्याला सांगत होते हो येतील. पण प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे काहीजण नाही येऊ शकले. पण तो मला शेवटपर्यंत दहा वेळा बोलला जान्हवी कोण नाही पण तू आलीस. त्याला खूप वाईट वाटलेलं."
























