Nivedita Saraf: मी कट्टर भाजप समर्थक, मला अभिमानही वाटतो; अभिनेत्री निवेदिता सराफ यांची स्तुतीसुमनं, नेमकं काय म्हणाल्या?
काही दिवसांपूर्वीच दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची उघडपणे प्रशंसा केल्यानंतर, आणखी एका अनुभवी कलाकाराकडून असा राजकीय कल जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nivedita Saraf: ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या बालदिन विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांना त्यांच्या पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विशेष क्षणी भावना व्यक्त करताना निवेदिता सराफ यांनी स्वतःला भाजपची कट्टर समर्थक असल्याचे जाहीरपणे सांगितले. काही दिवसांपूर्वीच दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची उघडपणे प्रशंसा केल्यानंतर, आणखी एका अनुभवी कलाकाराकडून असा राजकीय कल जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंचावरून बोलताना त्या म्हणाल्या, “आज मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे आभार. आमदार संजय केळकर यांचे विशेष अभिनंदन बिहारबद्दल.. . मी थोडी ‘कट्टर बीजेपी’ असल्याने आजूबाजूला एवढे सगळे पाहून मला फार अभिमान वाटतो.” यावेळी मंगेश देसाई, विजय पाटकर आणि इतर मान्यवरांची त्यांनी कृतज्ञतापूर्वक आठवण केली.
काय म्हणाल्या निवेदिता सराफ?
त्या म्हणाल्या, आज जी मी काही आहे ते माझे गुरु ,पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला. याचा विशेष आनंद.आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरुवात बालरंगभूमी पासून झाली. सुधा करमरकर माझ्या गुरु . त्यांच्या संस्थेत अनेक बाल नाट्य केलं. मला स्टेजवर उभे राहायला कोणी शिकवले तर ते सुधाताई यांनी. त्या काळात रत्नाकर मतकरी ,सुधाताई हे त्याकाळात सातत्याने बालनाट्य करत. महाराष्ट्रभर दौरे करत.
बालनाट्य करणे कठीण पण काळाची गरज आहे. बालनाट्यात आपण उद्याचे चांगले प्रेक्षक घडवत असतो. नाटक कसे बघितले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले प्रेक्षक बनतात. सभा धीटपणा येतो. त्यामुळे बालनाट्य शिबिरे घेतली पाहिजे.माझी वाटचाल बाल रंगभूमी पासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे असे वाटत आहे.
आपल्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलताना निवेदिता म्हणाल्या, “माझा अभिनय प्रवास बालनाट्यापासून सुरू झाला. सुधा करमरकर यांनी आम्हाला स्टेजवर आत्मविश्वासाने उभं राहायला शिकवलं. नाटक कसं पाहायचं, त्याचं महत्त्व काय हे सगळं त्यांनी आम्हाला बालपणीच दिलं.” त्यांनी पुढे सांगितलं की प्रत्येक मुलगा क्रिकेट शिकला म्हणून सचिन तेंडुलकर बनत नाही, आणि गाणं शिकून सर्वजण सोनू निगम होत नाहीत; परंतु त्यांच्यात चांगल्या श्रोत्यांची, प्रेक्षकांची जडणघडण होते आणि व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लागतो.
“कुणास ठाऊक, कदाचित मी आणि अशोक कधीतरी बालनाट्यही करू. खरं तर नाटक आपण घरी रोजच करतो, म्हणून आता बालनाट्य करण्याचा विचार आला,” असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार स्वीकारताना त्या भावूक झाल्या आणि म्हणाल्या, “हा पुरस्कार मला माहेरचा वाटतोय, पण तो माझ्या पतीच्या हस्ते मिळाल्याने सासरकडून मिळाल्यासारखंही वाटतंय. आमचा संसार 37–38 वर्षांचा आहे. मी जिथे जन्मले त्यापेक्षा जास्त काळ मी सासरी सुखाने घालवला. त्यामुळे दोन्ही घरांचा सुंदर मिलाफ माझ्या आयुष्यात आहे. कारण आपल्या समाजात लग्न हे फक्त दोन व्यक्तींमध्ये नसतं. ते दोन कुटुंबांच्या एकत्र येण्याचं नातं असतं.” असंही त्या म्हणाल्या.























