Sankarshan Karhade : कोणता पक्ष आवडतो, कोणत्या पक्षावर राग? 'संकर्षण'ने सांगितला कवितेचा अर्थ
Sankarshan Karhade : अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेची 'याचं एक मत वाया गेलं' ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या गाजणाऱ्या कवितेनिमित्त त्याने 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावली होती. त्याच्यासोबत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकरदेखील उपस्थित होते.
Sankarshan Karhade : कवी, कविता आणि राजकारण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मराठीसह जावेद अख्तरांपर्यंत अनेक कवी विधानपरिषद राजकारणाच्या माध्यमातून राज्यभभेची संलग्न झाली. तर अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांचं कवी मन आपण साऱ्यांनीच अनेकदा पाहिलंय. प्रचाराच्या या रणधुमाळीत आपली मते जनतेसमोर मांडत असताना जनतेच्या मतांची मागणी करणाऱ्या नेत्यांना लोकाचं आपल्याबद्दल नेमकं मत काय याचा बहुदा विसर पडला होता आणि त्याचवेळी आमचं मत वाया गेलं म्हणत संकर्षण कऱ्हाडेनं (Sankarshan Karhade) सर्वसामान्यांच्या मनात साचलेल्या असंतोषाला वाचा फोडली आणि राज्यभरातील राजकारण्यांनी या कवितेची दखल घेतली.
संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेनं महाराष्ट्रभर धुराळा उडवून दिला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील कवितेचं भरभरून कौतुक केलं आहे. गाजणाऱ्या कवितेबद्दल संकर्षण कऱ्हाडे म्हणाला,"राजकारणावर कविता करण्याचं असं मी काही ठरवलं नव्हतं. बातम्या पाहून आपण टीव्ही बंद करत असतो. पण बातम्या बंद होत नाहीत. त्या आपल्या डोक्यात राहतात. दरम्यान माझ्या डोक्यात विचार आला जर एक कुटुंब असेल त्यात एक आजोबा असतील जे वेगळ्या पक्षात असतील, मुगला वेगळ्या पक्षात, सून वेगळ्या पक्षात तर सर्व गोंधळच आहे. मतदान ही फालतू गोष्ट नाही. त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे. याच विचाराने मी ही कविता लिहिण्याचा घाट घातला".
मला कोणत्याच पक्षाबद्दल असूया, राग, द्वेष, प्रेम नाही : संकर्षण कऱ्हाडे
कवितेबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला,माझे दोन प्रेक्षक आहेत. एक माझं कुटुंब आणि दुसरा माझा मित्र डॉ. अनिकेत सराफ. सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता. मी सुरुवातीला या कवितेतील पात्रांची नावे त्या-त्या पक्षांतील नेत्यांची ठेवली होती. पण अनिकेतने मला नाव नको ठेऊ असं सांगितलं. नाव ठेवली तर ती त्या नेत्यांची गोष्ट होईल. मतदारांची गोष्ट होणार नाही असं त्याचं मत होतं. मला ती सूचना खूप महत्त्वाची वाटली. त्यानंतर मी ती नावे काढली. या कवितेच्या प्रोसेसला 10-12 दिवसांचा वेळ लागला. कविता बाहेर आल्यानंतर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी ती उचलून धरली. सर्वांनाच ती आवडली. राजकारणातलं मला काही कळत नाही. माझा तो प्रांत नाही. पण मला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. या भावनेतून मी व्यक्त झालो. मला कोणत्याच पक्षाबद्दल असूया, राग, द्वेष, प्रेम नाही".
संकर्षणच्या कवितेचं सर्वपक्षीय राजकारण्यांकडून कौतुक
संकर्षण म्हणाला,"कविता व्हायरल झाल्यानंतर विनोद तावडे सरांचा मला पहिला कॉल आला. मला म्हणाले, अरे काय सुंदर कविता लिहिली आहेस. लगेचच त्यांची पत्नी वर्षा ताई पवार यांचा मला फोन आला. त्या म्हणाल्या, विनोद सरांनी दिल्लीवरुन तुझी कविता कुटुंबातील सर्व ग्रूपवर शेअर केली आहे. त्यांना कविता प्रचंड आवडली आहे. एक फोन आला तेव्हा मी बायको आणि मुलांसोबत मरीन ड्राईव्हला गेलो होतो. नमस्कार संकर्षण कऱ्हाडे बोलतोय का? मी अमित ठाकरे बोलतोय. साहेबांना बोलायचंय वेळ आहे का? आणि राज ठाकरे बोलायला लागले, जय महाराष्ट्र मी राज ठाकरे बोलतोय. काय सुंदर कविता लिहिली तुम्ही. राजकारण, सिनेमा, कुटुंब अशा अनेक गोष्टींवर राज ठाकरेंनी गप्पा मारल्या. आदेश बांदेकरांचा फोन आला की, उद्धव ठाकरे तुला कॉल करतील फोन रेंजमध्ये ठेव. त्यानंतर पाच मिनिटांत उद्धव ठाकरेंचा फोन आला. नमस्कार मी उद्धव ठाकरे बोलतोय. ते मिश्किलपणे मला म्हणाले, आमच्या सूनेचं अस्मिताचं मत वाया गेलं म्हणताय. पुढे ते म्हणाले, आम्ही व्यंगचित्र पाहत मोठे झालेली माणसं आहोत. फार वर्षांनी असं कोणीतरी लिहिलं आहे ज्यात आम्हालाच आमचा चेहरा पाहायला मिळतोय. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असं लिहित चला. आम्हालाही आमचं काय चुकतंय ते कळेल".
अशोक नायगावकर कवितेबद्दल म्हणाले,"संकर्षणच्या कवितेमुळे मी मात्र नाराज झालो. असं काहीतरी लिहित जा असं घरच्यांकडून मला ऐकावं लागलं".
कवितेतल्या आजोबांनी कोणाला मत दिलं?
कवितेतल्या आजोबांनी कोणाला मत दिलं? याबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला,"कवितेतील आजोबा हे अभिजीत बिचुकलेसारखे आहेत. ते दरवर्षी राष्ट्रपती पदासाठी उभे राहतात, असं मला या कविवेत लिहायचं होतं. पण ते पसरट होईल त्यामुळे मी आवर घातला".
संबंधित बातम्या
Sankarshan Karhade : राजकारण्यांची पिसं काढणारी कविता व्हायरल, उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, खळखळून हसत म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets