Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Saif Ali khan: लिलावती रुग्णालयातील डॉ.निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ.नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (Saif ali khan) रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर फीट अन् हसतमुख दिसून आला. आपल्या वांद्र येथील घरी परतल्यानंतर सैफने त्याच्या चाहत्यांना अभिनंदन केले. पांढरा शर्ट, निळी जिन्स आणि हसतमुख चेहरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सैफ अली खान एवढा तंदुरुस्त व फीट कसा असाही प्रश्न अनेकांना पडला. सोशल मीडियावर सैफचे घराबाहेरील फोटो व्हायरल झाले असून सैफवरील हल्ल्यावरच आता नेटीझन्सने शंका उपस्थित केल्या आहेत. त्यातच, आता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील नेत्यांनीही सैफ फीट व तंदुरुस्त असल्यावरुन वैद्यकीय उपचार आणि हल्ल्यासंदर्भाने शंका उपस्थित केली आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील सैफ अली खानच्या तंदुरुस्तीवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
लिलावती रुग्णालयातील डॉ.निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ.नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यावेळी, सैफ अली खानच्या मानेजवळील बाजुतून अडीच इंच चाकू बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं. त्यानुसार, पुढील दोन दिवसांत सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, सैफला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर हसतमुख, काळा गॉगल परिधान केलेला तंदुरुस्त पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनीही सैफच्या प्रकृतीबाबत भाष्य करताना रुग्णालयातील डॉक्टर व सैफ अली खानच्या कुटुंबीयांनाच लक्ष्य केलंय.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि सैफ अली खान कुटुंबीयांवर मोठा आरोप करण्यात आला आहे. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 6 तास ऑपरेशन केले आणि सैफ अली खानचा पाठीत मानेजवळ अडीच इंच चाकू घुसला असल्याची माहिती दिली. मात्र, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 5 दिवसात उपचार करून गंभीर जखमी असलेल्या सैफ अली खानला एवढा चांगला कसा काय केला, असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांच्याकडून 16 जानेवारीच्या रात्री नेमकी काय घटना घडली, या संदर्भात सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांनी आणि लीलावतीच्या डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणीही करण्यात आलीय.
मुंबईत 30 लाख बांगलादेशी
लीलावतीच्या डॉक्टर आणि पोलिसांच्या तपासावर शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. सैफ अली खान हल्ला प्रकरणी विरोधकाकडून मुंबईत सेलिब्रेटी सुरक्षा नाही, येथील कायदा सुव्यवस्था खराब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, संजय निरुपम यांनी हल्लासंदर्भातच प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, मुंबईत 30 ते 40 लाख बांगलादेशी घूसकोर असल्याच्या दावा देखील संजय निरुपम यांनी केला आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















