एक्स्प्लोर
धनुषचे खरे आई-वडील कोण? अखेर निकाल लागला

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता धनुषचे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या दाम्पत्याचा खोटारडेपणा उघड पडला आहे. पालकत्वाचा वाद धनुषने जिंकला असून मद्रास हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्यानं आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला होता. थिरुप्पुवनम गावातील 65 वर्षीय कथिरेसन आणि 53 वर्षीय मीनाक्षी यांनी धनुष आपला मुलगा असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. धनुषच्या वकिलांनी मात्र हा पैसे उकळण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचं सांगितलं होतं. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. 18 नोव्हेंबर 2004 ला धनुषचा रजनीची कन्या ऐश्वर्याशी लग्न केलं. धनुष-ऐश्वर्याला यात्रा आणि लिंगा अशा दोन मुली आहेत. धनुषने दंडाधिकारी न्यायालयातील याचिका रद्द करण्याची मागणी चेन्नई हायकोर्टात केली होती.
अभिनेता धनुषचे खरे आई-वडील कोण? वाद कोर्टात
धनुष हा आपला तिसरा मुलगा आहे. आमच्या उदरनिर्वाहासाठी त्याने आम्हाला महिन्याला 65 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी दाम्पत्याने आपल्या याचिकेत केली होती. धनुष शाळेत असताना लहानपणीच घर सोडून पळाला होता. चेन्नईत जाऊन सिनेजगतात काम करण्यासाठी त्याने घर सोडलं होतं. आम्ही शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र सिनेमामध्ये दिसल्यानंतर आम्ही त्याला ओळखलं, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. धनुष अकरावीत असताना हॉस्टेलमधून पळून गेला होता, असं या दाम्पत्याने नोव्हेंबर 2016 मध्ये सांगितलं होतं. धनुषच्या गळ्याच्या उजव्या बाजुला एक तीळ आहे, तर उजव्या मनगटावर व्रण आहे, असा दावा दाम्पत्याने केला होता. या दोन्ही जन्मखुणांविषयी शाळा हस्तांतरण दाखल्यात माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.धनुषच्या शरीरावरील खुणा तपासा, पालकत्वाच्या वादाला नवं वळण
28 फेब्रुवारीला सरकारी डॉक्टरांकडून धनुषच्या शरीरावरील जन्मखुणांची तपासणी झाली. मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. डीएनए टेस्टला धनुषने नकार दिला होता, मात्र धनुषच्या शरीरावर कोणत्याही जन्मखुणा आढळल्या नाहीत. गळ्यावरील तीळ लेसर तंत्रज्ञानाने काढून टाकता येऊ शकतो, मात्र व्रण हटवता येऊ शकत नाहीत, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. 'कस्तुरी राजा हे धनुषचे बायोलॉजिकल पिता नाहीत. हॉस्टेलमधून पळून गेल्यावर त्याने कस्तुरी राजांकडे आश्रय घेतला. सुरुवातीला तो नोकर म्हणून राहत होता. मात्र सिनेमात त्याला मिळालेलं यश पाहून कस्तुरी राजांच्या कुटुंबीयांनी त्याला स्वीकारलं' असा दावा या दाम्पत्याने केला आहे.





















