शिक्षिकेच्या न्यायासाठी तापसी पन्नू कोर्टात, काळा कोट, जोरदार लढाई; बलात्कार पीडितेचं वास्तव दाखवणारा 'अस्सी'
Hard Hitting Courtroom Drama That Shakes You: अस्सी हा चित्रपट बलात्कार प्रकरण आणि न्यायालयीन प्रक्रियेवर आधारीत आहे. हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की पाहावा.

Assi Film Taapsee Pannu powerful lawyer performance: अस्सी. तापसी पन्नू अभिनीत हा सिनेमा समाजाचे वास्तव दाखवते. हा सिनेमा एका दबणाऱ्या आवाजाला बळ देते. अशा प्रकारचे चित्रपट समाज आणि सिनेमाची आत्मा जिवंत ठेवतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण ऐकत असतो. काही रिपोर्ट्सनुसार आणि आकडेवारीनुसार, दर 20 मिनिटांनी एक बलात्कार होतो, अशी माहिती आहे. 24 तासांत सुमारे 80 घटना नोंदवल्या जातात. काही जण अन्याय सहन करतात. तर, काही अन्यायाविरोधात वाचा फोडतात. हा सिनेमा समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास ताकद देते.
तुम्हाला जर बॉलिवूड आवडत नसेल, किंवा चित्रपट पाहण्याची आवड नसेल, किंवा आपल्याला फिल्मी कलाकारांविषयी जास्त आकर्षण नसेल, तरीही आयुष्यात हा चित्रपट एकदा पाहावा, असा आहे. भारतीय सिनेसृष्टीत अशा प्रकारचे चित्रपट तयार होणं आवश्यक आहे. कारण चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आपल्या समाजात नेमकं काय घडत आहे, हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. काही चित्रपटांमुळे समाजात बरेच सकारात्मक बदल होतात. अस्सी या चित्रपटातूनही बदल होईल, अशी अपेक्षा आहे.
चित्रपटाची कथा शाळेतील महिला शिक्षकाभोवती फिरते
चित्रपटात एका शाळेतील शिक्षिका रात्री उशिरा घरी परतते. काही जण तिचे अपहरण करतात. तसेच तिच्यावर बलात्कार करतात. त्यानंतर या घटनेवर कोर्टात केस सुरू होते. कोर्टात आरोपींना निर्दोष करण्याचा प्रयत्न सुरु होतो. दरम्यान, या सगळ्यात पीडित महिलेलाच प्रश्नांच्या कठड्यात उभं केलं जातं. वकिलाचीही सत्यासाठी धडपड असते. ही सगळी प्रक्रिया अनुभवण्यासाठी, हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहणं आवश्यक आहे.
चित्रपटात दाखवलेल्या एका प्रसंगात, महिला शिक्षकावर अत्याचार झाल्यानंतर, नववीतील विद्यार्थी Whatsapp ग्रुपमध्ये, पीडितेवर अश्लील टिप्पणी करतो. हे ऐकून आपल्याला प्रेक्षक म्हणून प्रचंड लाज वाटते. तर, एका सीनमध्ये, शाळेचे प्राचार्य म्हणतात, 'विद्यार्थ्यांचा निकाल बेस्ट आहे, पण संपूर्ण शाळा नापास झालीये', हे वाक्य थेट मनाला भिडतं. हा चित्रपट आपल्याला अस्वस्थ करतो. आपल्याला आतून हादरवून टाकतो. पीडितेसोबत जे काही घडतं, हे मोठ्या पडद्यावर पाहणं कठीण होतं. मग तिनं हा अन्याय सहन करताना काय अनुभवलं असेल, याची कल्पनाच आपल्याला करवत नाही. चित्रपटातून समाजाचं विदारक रुप पाहत असताना, आपल्याला कुटुंबाची काळजी वाटू लागते. सरकार, पोलीस, प्रशासन, हा चित्रपट तुम्हाला समजाचा एक वेगळा चेहरा दाखवतो, जे अत्यंत लाजीरवाणा आहे.
दमदार अभिनय, काळजात भिडणारे डायलॉग्स
अभिनेत्री तापसी पन्नूने वकिलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कोर्टाबाहेर तिच्या चेहऱ्यावर शाई फेकली जाते. तरीही ती त्याच अवस्थेत कोर्टात जाते. तसेच युक्तिवाद करते. तिच्या ठाम व्यक्तीमत्त्वामुळे वकिलाची भूमिका अधिक प्रभावी ठरते. कनी कुसरुती या साऊथ अभिनेत्रीनं पीडितेची भूमिका साकारली आहे. तर, कुमुद मिश्रा यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं. मुहम्मद जीशान अयूब यानं पीडितेच्या पतीची भूमिका साकारली आहे. कोर्टात मुलाला घेऊन जाण्याचा प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे.
नसीरुद्दीन शाह, सत्यजीत शर्मा, रेवती, मनोज पाहवा, सीमा पाहवा, सुप्रिया पाठक या कलाकारांनीही आपल्या भूमिकांना विशेष न्याय दिला. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन गौरव सोलंकी यांनी केले असून, अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटात कोणत्याही एका पात्राला 'हिरो' बनवलं नाही. तर, त्यांनी कथेलाच केंद्रस्थानी ठेवलं आहे. प्रत्येक पात्राला आवश्यक तेवढीच जागा देत त्यांनी वास्तववादी आणि प्रखर सिनेमा उभा केला आहे. रॉ कॅमेरा अँगल्समुळे हा चित्रपट पाहताना वास्तववादी वाटतो. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर समाजाचं वास्तव दाखवण्यासाठी आहे. हा चित्रपट विचार करायला भाग पाडतो. हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा.
रेटिंग: 4.5 / 5 स्टार्स

























