Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये मामा-भाच्यांची जोडीच ठरली 'सिंह'; मैथिली ताबेंचा दणदणीत विजय, विखे-खताळांच्या महायुतीचा दारूण पराभव
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेर नगरपरिषद निवडणूक अखेर तांबे–थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली आहे.

Sangamner Nagar Parishad Election Result 2025: गेल्या चार दशकांतील सर्वात चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राज्यभर लक्ष वेधून घेणारी संगमनेर नगरपरिषद निवडणूक (Sangamner Nagar Parishad Election) अखेर तांबे–थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या हाय-व्होल्टेज निवडणूक रणसंग्रामात मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा संगमनेर सेवा समितीकडे सोपवली आहेत.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी विरोधकांवर मोठी मात करत 16 हजार 408 मतांनी दणदणीत विजय मिळवला. ही निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता ‘तांबे–थोरात विरुद्ध खताळ–विखे’ अशा दोन प्रभावी राजकीय घराण्यांतील अस्तित्वाची लढाई ठरली होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून डॉ. मैथिली तांबे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विरोधकांचे सर्व अंदाज फोल ठरवले.
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: 27 जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण 30 जागांपैकी तब्बल 27 जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एक नगरसेवक, तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, उर्वरित सर्व जागांवर तांबे–थोरात गटाने घवघवीत यश मिळवत विरोधकांचा जवळपास सुपडा साफ केला आहे.
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: थोरात-तांबेंवर दाखवला जनतेने विश्वास
महायुतीकडून सुवर्णा खताळ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी स्वतः लक्ष घालून प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र, संगमनेरच्या मतदारांनी या सर्व समीकरणांवर पाणी फेरत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला. या निकालामुळे संगमनेर हा तांबे–थोरात गटाचा अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विजयाच्या पार्श्वभूमीवर शहरात जल्लोषाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत ऐतिहासिक विजय साजरा केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















