Congress Second List In Maharashtra काश्मीर ते कन्याकुमारी ते गुजरात ते अरुणाचल प्रदेश असा अवघा अखंड भारत पायी पिंजून काढून भारत जोडो न्याय यात्रेतून (Bharat Jodo Nyay Yatra) अवघ्या देशात 'डरो मत' असा संदेश रस्त्यावर उतरून देणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आता महाराष्ट्रातील (Maharashtra) आपल्याच विदर्भातील काँग्रेस (Congress) नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 'डरो मत' म्हणण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रात आतापर्यंत 11 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, काँग्रेसच्या विदर्भातील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीसाठी दाखवलेला ठेंगा मात्र चर्चेचा विषय झाला आहे.


विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला 


विदर्भ (Vidarbha) हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. विरोधी पक्षनेतेपद विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडे, प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे आहे. हे दोन्ही नेते विदर्भातील काँग्रेसचा चेहरा आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला आहे. काँग्रेस प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये सुरुवात करते तेव्हा त्याचा नारळ पहिल्यांदा हा विदर्भातूनच फोडला जातो. असा हा विदर्भाचा बालेकिल्ला काँग्रेस असताना त्या ठिकाणी नेते मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसत आहे.


भाजपकडून माजी मुख्यमंत्री लोकसभेच्या रिंगणात 


भाजपने आपली पहिली यादी जाहीर करताना माजी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास भाग पाडलं आहे. विद्यमान खासदारांची तिकिट सुद्धा दणक्यात कापली आहेत. मुंबईमधील दोन भाजप खासदारांची तिकिटे कापली आहेत. भाजपच्या पातळीवर धडाधड निर्णय होत असताना काँग्रेसच्या किमान वरिष्ठ नेत्यांना यामधून बोध घेता येत नाही का? असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे.


नाना पटोले, विजय वडेट्टीवारांनी पळ काढला


विदर्भामध्ये काँग्रेस वातावरण निर्मिती करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा गोंदिया लोकसभा (Bhandara-Gondia) जागेवरून निवडणुकीसाठी उतरवण्याचा विचार होता. मात्र, नाना पटोले यांनी निवडणुकीतून पळ काढताना लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तुलनेत दुबळा उमेदवार देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. ही स्थिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सुद्धा झाली असून त्यांनी सुद्धा चंद्रपूरच्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला आहे. 


चंद्रपूरची जागा (Chandrapur) ही एकमेव आहे ज्या ठिकाणी 2019 मध्ये काँग्रेसची राज्यात दाणादाण उडाली असताना याठिकाणी विजय मिळाला होता. दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता. आता या ठिकाणी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. मात्र, त्या जागेवरती विजय वडेट्टीवार स्वत: पळ काढून आपल्या मुलीसाठी प्रयत्न करत आहेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या ठिकाणी त्यांच्या मुलीला संधी दिली जाते की प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली जाते? आता याकडे लक्ष असेल. मात्र, याठिकाणी प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी द्यावी, असा सूर स्थानिक पातळीवर दिसून येत आहे. 


मात्र, विदर्भातील दहा जागांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून नेतृत्वाकडून जो प्रयत्न सुरू होता त्याला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सुरुंग लावल्याचे स्पष्ट दिसत आहे. 2014 मध्ये नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांनी प्रफुल पटेल यांचा दारुण पराभव केला होता. मात्र, त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपला सोडचिट्टी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


यानंतर नाना पटेल यांना काँग्रेसकडून 2019 मध्ये नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात उतरवण्यात आलं होतं. मात्र, नितीन गडकरी यांनी दोन लाख मतांनी पटोलेंचा पराभव केला होता. गडकरी यांना जवळपास 6 लाख मते मिळाली होती, तर पटोले यांना जवळपास चार लाख मते मिळाली मिळाली होती. याठिकाणी आता काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमधील गटतट विसरून काँग्रेस नेते एकत्र आल्याने नितीन गडकरी यांच्यासमोर आव्हान निर्माण करतात का? हे सुद्धा पाहणं तितकच आवश्यक आहे. 


विदर्भातील काँग्रेस नेत्यांची फळी


दरम्यान, विदर्भामध्ये काँग्रेसकडे सुनील केदार, नाना पटोले, विकास ठाकरे, अमर काळे, प्रतिभा धानोरकर, यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अभय पाटील, मनीष पाटील हे सर्व कुणबी मराठा नेते आहे. हे नेते विदर्भामध्ये काँग्रेससाठी कसा प्रचार करतात यावर विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.  


महाविकास आघाडीत जागावाटपावरून अजूनही वाद 


वरिष्ठ काँग्रेस नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार नसताना जागावाटपात मात्र कमालीचे आग्रही आहेत. भिवंडी, सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य जागेवरती महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) अजूनही मतभेद आहेत. त्यामुळे हा निर्णय आता दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी सांगलीवर दावा केल्याने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये वातावरण थोडसं तणावपूर्ण झाला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसकडून भिवंडी जागेवर दावा करण्यात आला आहे. मुंबई दक्षिण मध्य या जागेवर सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. 


त्यामुळे हा वाद संपवणार तरी कसा हा प्रश्न एका बाजूलाच असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीकडे फिरवलेली पाठ सुद्धा सुद्धा चिंतनाचा विषय आहे. काँग्रेसकडून अस्तित्वाची लढाई सुरू असताना जर वरिष्ठ काँग्रेस नेते रणांगणामध्ये उतरून वातावरण निर्मिती करत नसतील तर कार्यकर्त्यांनी त्यामधून नेमका कोणता बोध घ्यायचा अशीच विचारणा काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या