उत्तर प्रदेश ATS पथक मुंबईत, भिवंडीतून तिघांना अटक; दहशतवादी कारवायांतील सहभागाचा तपास
27 ऑगस्टच्या तपासात भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखोंची रक्कम फिलिस्तीन देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले.

ठाणे : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यत छापेमारी करत भिवंडीतील (bhiwandi) विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे 3 लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवल्याचा आरोप आहे. खळबळजनक म्हणजे या तिघांवर संशयास्पद दहशतवादी (Terrorist) कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (22 वर्षे), रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी) अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (22 वर्षे), रा. गुलजार नगर, भिवंडी) जैद नोटियार अब्दुल कादिर (22 वर्षे), रा. वेताळ पाडा, भिवंडी, अशी अटक केलेल्या तरुणाची नावे आहेत.
एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की, 27 ऑगस्टच्या तपासात भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखोंची रक्कम फिलिस्तीन देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर यूपी एटीएस एक पथक शुक्रवारी भिवंडीत दाखल होऊन तपास सरू केला असता दिवसभर या तरुणावर पळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमरास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकाने अचानक छापे मारी करत अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर याब दोघांची नावे सांगितल्यावर पथकाने दोघांनाही शांतीनगर आणि निज्मापुरा पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर दहशतवाद्यांना रक्कम गोळा करून पाठवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरा या तिन्ही तरुणांना पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ तालुक्यात नेवाळी नाका परिसरामधून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून आफताबचे घर शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करत त्याला अटक करून दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात आले. आता त्या पाठोपाठ भिवंडीतील या तिघांवर देश विघातक संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे, आणि तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
2 वर्षांपूर्वी तिघांना अटक
दरम्यान, गेल्या दोन वर्षापूर्वी नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी, देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ साहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या 3 पदाधिकाऱ्याना भिवंडी शहरातून ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून इसीस च्या आठ ते दहा दहशतवाद्यांना काही महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. एकंदरीतच भिवंडी शहर व ग्रामीण भागात दशतवादीसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तवसह देश विघातक कारवाईचे कनेक्शन उघड झाल्याने ठाणे जिल्हासह मुंबईच्या सुरक्षेच्या दुष्टीने धोक्याचे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे.
हेही वाचा
मुंबईकरांना गुडन्यूज, नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर आता केवळ अर्ध्या तासात; महामार्गातील मोठा अडथळा दूर
























