Malegaon Blast Case Verdict मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
Malegaon Blast Case Verdict: मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे.

Malegaon Blast Case Verdict: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case Verdict) न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला.
भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. निर्दोष सुटका होताच आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले. आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असं म्हणत आरोपी भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
न्यायालयाने निकाल देताना नेमकं काय सांगितलं?
बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. चेसीस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही. आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे UAPA लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.
NIA Court acquits all accused in Malegaon blast case | Accused acquitted of all charges of Unlawful Activities (Prevention) Act (UAPA), Arms Act and other charges. https://t.co/GNyiAclfz7
— ANI (@ANI) July 31, 2025
17 वर्षांनी निर्दोष सुटका; प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया-
मला जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नात्याने न्यायचा सन्मान करून मी आले होते. 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आलं. माझं आयुष उध्वस्त केलं. मी 17 वर्ष अपमानित झाले. मला स्वतःच्याच देशात आतंकवादी बनवलं. ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे. मला ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्या बद्दल आभार...भगव्याला आंतकवादी म्हटलं. भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाच नाव दिलं त्यांना कधी माफ केलं जाणार नाही, असं निकालानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
मालेगाव स्फोटप्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं?
- 29 सप्टेंबर 2008 साली रमजान महिन्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी
- मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीचा झाला होता स्फोट
- भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आहेत आरोप
- 19 एप्रिल ला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने ठेवला होता निर्णय राखून
- आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची एनआयएची मागणी
- मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याच कारस्थान असल्याचं एनआयए आहे
- संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयए म्हणणं आहे
- मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला होता तर 2011 साली तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला
- सात आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर 2018 मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली
- आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे
- सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने 323 साक्षीदार तपासले असून त्यातील 37 साक्षीदार फितूर झाले
- ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची असल्याचा एटीएसचा दावा होता
- 23 ऑक्टोबर 2008 मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर अटक करण्यात आली
- त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात 14 नोव्हेंबर पर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली
- एटीएसने या प्रकरणी मोक्का लावला होता मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला
- जानेवारी 2008 मध्ये कट रचण्यात आला असून आरोपींनी फरीदाबाद भोपाळ नाशिक येथे मीटिंग केलाच एटीएसचा दावा होता
- स्फोटांमध्येव RDX चा वापर करण्यात आला होता
- जम्मू आणि काश्मीर मधील पोस्टिंग दरम्यान आरडीएक्स मिळवल्याचा आणि त्यानंतर सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब बनवण्यात आल्याचा एटीएसचा आरोप
- चतुर्वेदी आणि रामचंद्र कालासंग्रा यांनी बॉम्ब दुचाकीवर बसून त्यानंतर ती दुचाकी गजबजलेल्या ठिकाणी पार करण्यात आले
- रामचंद्र कलासंग्रा आणि संदीप डांगे अद्याप फरार
- प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या नावावर असलेली मोटरसायकल कलासांग्राच्या ताब्यात होती: NIA
- मला हा प्रकरणात गोवण्यात आल्याचा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा दावा आहे आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा कर्नल प्रसाद पुरोहित यांचा दावा आहे
- मोक्का हटवल्यानंतर मोक्का अंतर्गत घेतलेले जबाबांची किंमत जवळ जवळ शून्य
- एटीएसच्या तपासात दोष असल्याचा दावा करत nia ने नव्याने काही जबाब नोंदवले होते त्यावेळी देखील काही साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली
- प्रथमदर्शनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर विरोधात पुरावे नसल्याचे सांगत तिला आरोपींची यादीतून वगळण्याची होती NNIA ची मागणी
- मात्र पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करत येण्याची मागणी विशेष एनआयए कोर्टाने फेटाळली होती.
- आज (31 जुलै) न्यायालयाने मालेगाव स्फोटप्रकरणी अंतिम निकाल दिला. यामध्ये मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
कोणा कोणाला आरोपी ठरवले होते–
1. प्रसाद पुरोहित
2. साध्वी प्रज्ञासिंह
3. समीर कुलकर्णी
4. रमेश उपाध्याय
5. अजय राहिरकर
6. सुधाकर द्विवेदी
7. सुधाकर चतुर्वेदी
8. रामजी कालसंग्रा – फरार
9. शामजी साहू – फरार
10. संदीप डांगे – फरार
11. प्रविण तकलकी – फरार
12. राकेश धावडे - फरार
























