Indian Railway Rule: रेल्वे लागू करणार विमान प्रवासाचा नियम, मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणं महागात पडणार, रेल्वे दंड आकारणार
Indian Railway Rule: विमान प्रवासाप्रमाणे आता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगेज रुलचं पालन करावं लागेल. या नियमानुसार निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचं साहित्य सोबत नेल्यास दंड द्यावा लागेल.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम लागू करणार आहे. त्या नियमाचं पालन काटेकोरपणे केलं जाणार आहे. ज्या प्रमाणं विमान प्रवास करताना ठराविक वजनापर्यंत साहित्य घेऊ जाता येतं. त्याप्रमाणं रेल्वे प्रवासात देखील लगेजच्या वजनाच्या नियमाचं पालन करावं लागेल. जे प्रवासी लगेज नियमाचं पालन करणार नाहीत त्यांना दंड द्यावा लागेल. यापूर्वी देखील अशा प्रकारचा नियम आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नियमाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.
रेल्वेकडून निश्चित करण्यात आलेल्या वजनमर्यादेपर्यंत साहित्य प्रवासी त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. देशातील काही प्रमुख रेल्वे स्टेशनवर वजनाच्या संदर्भातील मर्यादेचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे. विमान प्रवासात ज्या प्रमाणं नियमाचं काटेकोर पालन केलं जातं, त्याप्रमाणं रेल्वे देखील नियम लागू करणार आहे. नियमानुसार प्रवासाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मोफत साहित्य घेऊन जाण्याची मर्यादा वेगळी असते.
प्रथम श्रेणी एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांना 70 किलो वजनाचं साहित्य घेऊ जाण्याची परवानगी आहे. एसी सेकंड क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 50 किलो आणि स्लीपर कोचमधून प्रवास कणाऱ्यांसाठी ही मर्यादा 40 किलो असेल. जनरल तिकीटावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मर्यादा 35 किलोपर्यंत असेल. प्रवाशांना निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 10 किलो अधिक साहित्य घेऊन जाण्यास परवानगी असेल. मात्र त्यापेक्षा लगेजचं साहित्य जास्त भरल्यास त्याचं स्टेशन काऊंटरवरुन बुकिंग करावं लागेल.
एखाद्या प्रवाशाकडे निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचं साहित्य सापडल्यास त्याला दंड द्यावा लागेल. हा दंड नियमित लगेजच्या शुल्काच्या दीडपट असेल. त्यामुळं लगेज वजन मर्यादेचा भंग करणं प्रवाशांना महागात पडू शकतं.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हा नियम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी महत्त्वाचा आहे. काही प्रवासी अधिक लगेज सोबत घेऊन प्रवास करतात त्याचा इतर प्रवाशांना त्रास होत असतो, काही वेळा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं लगेजवर नियंत्रण आणण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय आहे. सणांच्या काळात आणि उन्हाळ्याच्या दिवसात हा नियम फायदेशीर ठरु शकतो.
























