Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता. काही कुटुंबांना आता 10 लाखांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.

नवी दिल्ली: देशात वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालवली जाते. या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. त्या बदलानुसार लाखो कुटुंबाना दुप्पट लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळायचा. काही कुटुंबाना आता 10 लाख रुपयांच्या खर्चापर्यंतचं कवरेज मिळणार आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय?
केंद्र सरकारची ही मोठी आरोग्य विमा योजना आहे. ज्यामध्ये गरीब कुटुंबांना वैद्यकीय खर्चातून संरक्षण मिळतं. ही योजना गंभीर आजारांसाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण देते. देश भरातील हजारो रुग्णालयं या योजनेद्वारे कॅशलेस आणि पेपरलेस सेवा देतात. आयुष्मान भारत योजनेचा मोठा फायदा या योजनेतील सर्व आजारांबाबत उपचार घेत असताना पहिल्या दिवसापासून कव्हर केलं जातं. ही योजना पात्र कुटुंबांसाठी संरक्षण प्लॅन बनते. यात कुटुंबाच्या सदस्यांची संख्या किंवा वयाची मर्यादा नाही.
आयुष्मान भारत योजनेत कुटुंब शब्द महत्त्वाचा आहे. यात मुख्य लाभार्थी आणि पात्र कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये पती/ पत्नी, मुलं, आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण यासह त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा समावेश असतो.
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 70 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 5 लाख रुपयांचं संरक्षण वाढवलं आहे. यामुळं अतिरिक्त रक्कम कुटुंबासाठी गरजेच्या असलेल्या 5 लाखांच्या फॅमिली फ्लोटर पेक्षा वेगळी असते. त्यामुळं हे संरक्षण एकूण 10 लाख रुपयांवर पोहोचतं. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक असावं आणि जे आधार कार्डवर देखील नोंदवलेलं असावं.
आरोग्य प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. आजारपण अचानक आल्यास उपचाराचा खर्च करणं कुटुंबासाठी अडचणीचं ठरतं. त्यामुळं काही लोक आरोग्य विमा घेतात. आरोग्य विमा जे घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजनांचं एकत्रीकरण करुन प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजना देखील त्यासोबत संलग्न करण्यात आली आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या





















