एक्स्प्लोर

BLOG : एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..

या नोंदी आहेत एका महाभयंकर साथीच्या. सोबतच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या परिचारिका आहेत सुरेखाताई खैरनार! फोटो दीड दशकापूर्वीचा आहे, कुंभमेळ्याच्या गदारोळावरून चर्चेत आलेल्या नाशिकमधला हा फोटो आहे. नाशिकच्या कचरा डेपोत कचराडेपोमध्ये मिळणाऱ्या वस्तूंवर स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना सुरेखाताई मोफत औषधे आणि कंडोम देत असत. त्यांचे आरोग्य प्रबोधन करत, त्यांनी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करत. सगळीकडे अशा सुरेखाताई पोहोचू शकल्या नाहीत आणि या साथीत लाखो स्त्रियांनी आपले प्राण गमावले. मात्र काहींनी या साथीत जीव धोक्यात घालून बदनामी सोसून काम केलं. त्यांच्यासाठी कुणी काय केलं त्याची ही नोंद. 

कचराडेपो असोत की रस्त्यावरचे ढाबे असत किंवा अजस्त्र ट्रक पार्किंगचे लॉटस् असोत, ट्रक ड्रायव्हर्सनी सुरुवातीच्या काळात एड्सचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला. परिणामी सुरुवातीच्या काळात असे लोक मरण पावले की ज्यांचा सेक्सवर्किंगशी काडीचाही संबंध नव्हता. लोक चक्रावून गेले होते. 2003 साली या गुंत्याची उकल झाली.

त्या काळात एक अफवा अशी असायची की थिएटरमध्ये एड्सबाधित लोक तुम्हाला टाचणी किंवा सुई टोचवतील आणि मग तुम्ही बाधित व्हाल. 2004 मध्ये एड्सवर प्रबोधन करायला गेलं तरी अनेक ठिकाणी एकही माणूस ऐकून घ्यायला समोर येत नसे. जणू काही आपण ही माहिती ऐकली तरी आपण कलंकित होऊ असे लोकांना वाटायचे. आज आपण ज्या विस्मयकारक पद्धतीने ही साथ आटोक्यात आणली आहे त्याचे चित्र गतकाळात एव्हढे भीषण होते असे कुणालाही खरे वाटणार नाही.

माणूस काळा पडला वा त्याचे शरीर आक्रसत गेलं की लोक कुजबूज करायचे की याला एड्स झालाय की काय! अनेक टीबी ग्रस्त लोकांना यामुळे अवहेलनेला तोंड द्यावे लागले. काही केसेस (पुण्यातल्या) अशा होत्या की केवळ संशयाने घरातल्या लोकांनी या बायकांना घराबाहेर काढले होते. त्यांना लाख समजावून पाहिले तरी त्यांनी त्या बायकांना घरात घेतले नाही. काही महिला सुधारगृहात राहिल्या तर काही धंद्याला लागल्या. काहींचे काय झाले पुढे कळालेच नाही. ज्या सेक्सवर्किंगमध्ये आल्या आल्या होत्या त्यांना केवळ टीबी झालाय हे सांगितल्यावर त्या धाय मोकलून रडल्या. त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यावर त्यांनी हात वर केले. काही बायकांना तर मुलाबाळापासून तोडलं होतं. मुळात याविषयी खुलेपणाने कुठे चर्चा झाल्या नाहीत, केवळ लपवण्याकडे कल असल्याने अनेकांचा भयंकर कोंडमारा झाला!

महाराष्ट्रात प्रारंभीच्या काळात सांगली मिरज भागात याचे रोगी वेगाने सापडत गेले. ग्रामीण भागातही लोण पोहोचले तेव्हा नुसत्या संशयावरून लोक संबंधितांना वाळीत टाकू लागले. काही ठिकाणी बाधित व्यक्तींनी आत्महत्या केल्या. तर काही घटनांमध्ये अख्ख्या कुटुंबाने आत्महत्या केल्या. लोकांनी प्रबोधन टाळून भीती आणि दहशत स्वीकारली होती. असं असूनही 1990 ते 2010 हा भारतातील brothel based सेक्सवर्किंगचा peak period मानला जातो, हे कसे काय याचे उत्तर भारतीय समाजमानसशास्त्रातूनच मिळू शकते.

लोक ढीगाने मरु लागले आणि बाधित लोकांवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या वाढू लागल्यावर सरकार जागे झाले आणि टीव्हीवर जाहिराती सुरू झाल्या. छुने से प्यार बढता है अशा अर्थाची टॅगलाइन असणारी शबाना आजमी यांची जाहिरात चर्चेत आली होती. तेव्हा काही लोक शबानांचीच खिल्ली उडवत होते!

त्या दोन दशकात भारतीय सरकारी दूरचित्रवाणीवर निरोध आणि डिलक्स निरोध यांच्या जाहिरातीचा मारा झाला ही एक वेगळीच बाजू होती. तर दुसऱ्या बाजूला देशभरातील मुताऱ्यांमध्ये लाल पिवळ्या कागदांवर कसलाही आगापिछा नसणारी अशास्त्रीय दावे करणारी pamplets नजरेस पडू लागली. दवाखाना टाळणारे आणि भीती बाळगून असणारे लाखों लोक याला बळी पडले आणि आपले आरोग्य त्यांनी आपण होऊन संकटात आणले. बीमारू (बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश) राज्यात यांनी धुमाकूळ घातला. नाजुक जागा, अवघड जागा, गुप्तइंद्रिय असल्या विचित्र शब्दांत समाज अडकून पडला होता आणि लोकही आपला आजार झाकून ठेवत होते. या सर्व नोंदी पाहिल्यावर लक्षात येते की हे काम खरेच महाभयंकर होते!

डब्ल्यूएचओने भारतातील एड्सच्या प्रादुर्भावा संदर्भात अत्यंत गंभीर इशारे दिले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की, साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्तवण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, who ने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य साथीवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले. 

हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, 2020 सालच्या महासाथीवरून आपली सार्वजनिक, खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची असल्याचे सिद्ध झाले. मग दोन दशकापूर्वी जेव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती. असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्त कंठाने आपल्याकडील सेक्सवर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर!

अशोक अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचे पुत्र. पीसींनी इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. तर अशोक हे मॅकिनस्की अँड कंपनीमध्ये वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत होते. एड्सच्या साथीचे इशारे जेव्हा जाहीर केले जाऊ लागले तेव्हा अनेकांच्या पोटात भीतीचे गोळे उठू लागले. अनेकांनी यासाठी काही तरी केलं पाहिजे यावर जोर दिला जाऊ लागला. याचवेळी तगड्या पगाराची ही नोकरी सोडून अशोकनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या एड्सविरोधी कॅम्पेनची निवड केली. 

तब्बल दोन दशकं त्यांनी यासाठी खर्ची घातली. या अनुभवावर त्यांनी - 'ए स्ट्रेंजर ट्रूथ : लेसन्स इन लव्ह, लीडरशिप अँड करेज फ्रॉम इंडियाज सेक्स वर्कर्स' हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वाचताना आपल्या देशातील वेश्यांनी केलेली कमाल लक्षात येते. इतकं होऊनही यांचे बिचाऱ्यांचे अपवाद वगळता कधी कुणी साधे आभार देखील मानले नाहीत. सरकारी यंत्रणांनी तर साधा नामोल्लेखही केला नाही. सर्वसामान्य नागरिकांना यांच्या विश्वाशी घेणंदेणंच नसतं त्यामुळे या जगल्या काय किंवा मेल्या काय याच्याशी त्यांना सोयरसुतक नसतं. असं असूनही या बायकांनी जे करून दाखवलं त्यामुळेच हे संकट प्रामुख्याने टळलं असं ठामपणे म्हणता येते.

समलिंगी, ट्रान्सजेंडर्स आणि वेश्या या तीनही घटकांनी आपआपला वाटा उचलला. आन्ध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमधून याची सुरुवात झाली. आपल्याकडे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, शहरात आणि गावात सेक्सवर्किंगच्या ठिय्यांची, ठिकाणांची धाटणी वेगवेगळी आहे. मध्यप्रदेशात हायवेवरती, तर युपीमध्ये भकास बकाल वस्त्यात, राजस्थानमध्ये ढाब्यांवर, दक्षिणेत सार्वजनिक ठिकाणालगत, नॉर्थइस्टमध्ये ग्रामीण भागात अशी यांची वर्कसिस्टीम आहे. आंध्रमध्ये बस स्थानके, रेल्वे स्थानके, सार्वजनिक उद्याने, पार्किंग लॉट्स, बकाल वस्त्यात हा उद्योग चालतो. बिल गेट्स फाउंडेशनच्या 'आवाहन' या प्रोग्रामअंतर्गत या घटकांना सामुहिकरित्या एकत्र आणून त्यांना एड्सविषयीची माहिती देणं हे काम सर्वात कठीण होतं. 

चार बायका एकीकडे तर चार बायका नाक्याबाहेर तर दुसऱ्या दोन बायका कुठेतरी बसडेपोच्या मागे! असा सगळा पाठशिवणीचा खेळ होता. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला डेटा मागितला गेला तेव्हा त्यांनी पोलीस यंत्रणेकडे बोट दाखवले. माझा अनुभव असा आहे की, याबाबतीतला पोलिसांचा डेटा निव्वळ भोंगळ असतो. मागील पानावरून पुढे असा खाक्या त्यात जास्ती दिसतो, फेक रेड्स आणि कुंटणखान्यातील बायकांशी चालकांशी असलेले लागेबांधे यामुळे हा धंदा जिथे चालतो तिथली खरी माहिती सरकारी कागदपत्रात कधीच आढळून येत नाही हे वास्तव आहे. यामुळे मोठी पंचाईत झाली. नेमक्या बायका किती आहेत आणि कुठे कुठे आहेत याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. लाखो अदृश्य बायकांना काही महत्वाचं सांगायचं आहे मात्र त्यांचे ठावठिकाणे हाती नाहीत अन हाती असलेला वेळ पाऱ्यासारखा सहज वेगाने निसटून चाललेला अशी विचित्र स्थिती ओढवली. यात बऱ्याच एनजीओंनी प्रामाणिक मदतीचे प्रयत्न करून पाहिले मात्र ठोस काहीच हाती लागत नव्हते.

अखेर काही वेश्याच पुढे आल्या. यात एक होती, थेनू. थिरूवेली नेंपेल्ली. तिचं टोपणनाव थेनू. तिच्या साथीला कामाठीपुरा (मुंबई), बुधवार पेठ (पुणे), सोनागाची (कोलकता), जीबी रोड (दिल्ली), गंगा जमुना (नागपूर), कबाडी बाजार (मेरठ), नक्कास बाजार (सहारनपूर), शिवदासपूर दालमंडी (वाराणसी), रेशमपूर (ग्वाल्हेर) या मुख्य रेड लाईट एरियाशिवाय लखनौ, कानपूर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, झाशी, दरभंगा, भोपाळ अशा अनेक छोट्यामोठ्या शहरातील बायका त्यांना जॉईन झाल्या. ग्राहकांनी निरोध न वापरता सहवास करू नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. 

इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला जो मूलतः पुरुषांच्या सेक्सविषयक जाणिवात खोल दडलेला आहे. निरोध वापरला नाही तर खरे सुख मिळत नाही आणि पौरुषत्व घटत जातं अशा विचित्र समजुतींनी लोकांना ग्रासलेलं होतं. त्यापायी या बायकांकडे मुक्त सहवासाची मागणी होते. एड्सची भीती असूनही अनेक पुरुष या बायकांकडे निरोधशिवाय शरीरसुखाची अट ठेवत. जोवर या बायकांना एड्सचं भयावह स्वरूप माहिती नव्हतं तोवर त्या त्याला बळी पडत गेल्या, मात्र जसजशी वेश्यांना बाधा होऊ लागली तसा एकच हाहाकार या बायकांत माजला. बायका ज्यांच्यासाठी काम करत त्या अड्डेवाल्या आणि दलाल हे केवळ पैशाचे भुकेले असल्याने त्यांना याच्याशी फारसं देणंघेणं नव्हतं. खेरीज निरोध वापरण्याची जबरदस्ती केल्यास दमदाटी मारहाण होऊ लागली. काहींवर अशीच जोरजबरदस्ती केली जाऊ लागली.

2004 मध्ये मुंबईत अशा काही घटना उघडकीस ज्यात काही एड्सबाधित पुरुषांनी हेतूपुरस्सर बायकांना फसवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवून त्यांना बाधित केलं. पोलिसांपर्यंत प्रकरणे गेली मात्र यावर पुढे काहीच झालं नाही. अखेर या बायकांनी हिम्मत दाखवत अशा पुरुषांना ठोकून काढण्याची तयारी करून ठेवली. मेरठ, जयपूर इथे अशी काही प्रकरणेही घडली. मग सर्वच वेश्यांची मानसिकता बदलली. दरम्यान सरकारी पातळीवरूनही सूत्रे वेगाने हलू लागली. वेश्यावस्तीत कॉईन बॉक्सच्या धर्तीवर निरोध बॉक्सेस ठेवण्यात येऊ लागले. 

एनजीओंना हाताशी धरून समुपदेशन आणि आरोग्य जागृती अभियान सुरु करण्यात आले. यातला एक महत्वाचा टप्पा धार्मिक बाबींशी निगडीत होता तो कसोटीचा मुद्दा होता मात्र तिथेही संयमाने काम केल्याने सरशी झाली. विस्ताराने सांगता येईल मात्र इथे आपण पुणे आणि मुंबईचे उदाहरण घेऊ. पुण्यात गणेशोत्सव काळात वेश्यागमन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, मुंबईत नववर्ष आगमनाच्या पूर्वसंध्येस वाढ जाणवते. या दोन्ही पर्वात विशेष खबरदारी घेतली जाऊ लागली. यास सामाजिक सहकार्यही मिळाले हे ही नमूद करावे लागेल.

वेश्यांकडे येणाऱ्या पुरुषांनाच निर्बंध लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पुढचा संसर्ग टळला इतकंच याचं वार्तांकन नसून याला आणखी एक पदर आहे, तो खरं तर अखिल समाजाचा आहे मात्र आजवर त्यासाठी कुणी यांना साधे ऋणनिर्देश देखील दिले नाहीत. या बायकांकडे येणाऱ्या पुरुषांना निर्बंध लावले नसते तर एका पुरुषामुळे संसर्गाची जी साखळी सुरु झाली असती त्याचे वाहक होऊन त्याच्या संपर्कात आलेल्या वेश्येने तिच्या संपर्कात आलेल्या अनेक पुरुषांना याचा संसर्ग बहाल केला असता. आणि तितक्या पुरुषांचे त्यांच्या घरच्या स्त्रीशी संबंध आल्यानंतर तितक्याच मोठ्या प्रमाणात सामान्य पांढरपेशी स्त्रियादेखील हकनाक बाधित झाल्या असत्या. 

हा मुद्दा कधी सामान्य जनतेने अधोरेखित केला ना माध्यमांनी यावर कधी चर्चासत्र घेतलं. यात काही एनजीओंनी जीव लावून काम केलं तर काहींनी निव्वळ आपलं उखळ पांढरं करून घेतलं. बिलकुल अक्षरशत्रू ते अल्पशिक्षित वेश्या ज्यांना आरोग्य जतन कशाशी खातात हे माहित नाही त्यांना एका भयानक रोगाची माहिती देऊन त्याविषयीच्या अभियानात त्यांना सामील करून घेऊन त्यांच्याच आधारे सर्वसामान्य जनतेचं संभाव्य नुकसान टाळणं हे एक अशक्य कोटीतील काम होते मात्र या बायकांच्या जिद्दीमुळे ते शक्य झाले.

2007 मध्ये अरुणा सोभन हिने अशोकना एक सवाल केला होता, त्याचा उल्लेख करून लेख आटोपता घेतो. एड्सबद्दल जागृतीसाठी आरोग्यसेवक सोनागाचीते पोहोचले होते. बाधा झाल्यास शारीरिक अवस्था किती वाईट होते, रोगी माणूस कसा झिजत जातो आणि शेवटी मरण पावतो याचं मुद्देसूद वर्णन त्या बायकांना ऐकवलं जात होतं. चाळीशीत पोहोचलेली अरुणा अचानक पुढे झाली आणि म्हणाली, "बाधा झाल्यास किती वर्षांनी माणूस मरतो ?"

अचानक आलेल्या या प्रश्नाने गोंधळून गेलेली आरोग्यसेविका उत्तरली, "जेमतेम दहा वर्षात माणूस मरण पावतो !" हे उत्तर ऐकून अत्यंत निर्विकारपणे थंड चेहऱ्याने अरुणाने प्रतिप्रश्न केला, "दहा वर्षे जगायचं कुणाला ? इथे खायचे वांदे आहेत. चार दिवस धंदा केला नाहीतर उपाशी मरून जाईन. धंदा सोडला तर पहिले चारपाच दिवस मनाला बरं वाटेल मात्र आमची असलियत कळली की पब्लिक लचके तोडेल, मग पुन्हा इथं यायला लागेल, मग नव्याने जम बसवावा लागतो. भुकेलं मरण्यापेक्षा साताठ वर्षे जगून मेलेलं बरं नाही का ?"

तिच्या प्रश्नाने सगळे अवाक झाले.ही अतिशयोक्ती नव्हती. 

अरुणाच्या विचारांशी सहमत असणाऱ्या शेकडो, हजारो स्त्रियांनी एड्सच्या काळात जाणीवपूर्वक स्वतःचा बळी दिला. यात चाळीशी पार केलेल्या वेश्यांचे प्रमाण लाक्षणिक होते. ज्यांची कमाई घटलेली होती त्यांनी मृत्यूला कवटाळले. खरं तर पुरुषी मानसिकतेने केलेले हे खून होते. हे विधान अतिरंजित वाटेल मात्र कुठल्याही एनजीओला वा आरोग्य - पोलिस वा तत्सम यंत्रणेला विचारून याची खात्री करून घेऊ शकता. 

झालं असं होतं की, जेव्हा 2003 पासून निरोध वापरल्याशिवाय शय्यासोबतीस मोठ्या प्रमाणात नकार समोर येऊ लागले तेव्हा ज्यांची कमाई अगदी नगण्य होती त्या बायका आपल्या पोटाची आग विझवण्यासाठी अशा पुरुषांना यास राजी झाल्या होत्या. यात काही पुरुष हे एड्स बाधित असूनही जाणीवपूर्वक या बायकांच्या आयुष्याशी खेळत राहिले, त्यातून या बायका आणि त्यांच्याकडे येणारे पुरुष अशी संसर्ग साखळी होत गेली. काही बायकांनी देखील सूडाचा प्रवास म्हणून हा प्रयोग केला हे विदारक सत्य टाळू शकत नाही. 

2012 नंतर जेव्हा यावर मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध झाली आणि सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात झालेल्या जागृतीमुळे व्यापक दक्षता बाळगली जाऊ लागलीय. मात्र या दोन दशकांत ज्यांनी आपलं पोटपाणी पणाला लावलं, ज्यांनी माहिती असूनही जीव टांगणीला लावले त्यांना काय मिळालं याचं उत्तर समाज नावाचा हा अजगर कधीच देऊ शकला नाही आणि देऊ शकणार ही नाही. 

आतादेखील एड्सचे नवे बाधित आढळून येताहेत, त्यात खंड पडलेला नाही. मात्र एक मोठा बदल झाला आहे. आता समलैंगिक आणि किन्नरांची संख्या तुलनेने अधिक आहे. एकमेकाविषयी जाणून न घेता थेट संबंध ठेवण्याआधी आरोग्य तपासणी महत्वाची आहे हे यांना समजून सांगायला काही एनजीओ तयार आहेत मात्र हे संबंधच छुपे आणि लपून असतात की हे लोक बाधा झाल्यावरच उपचाराला येतात. मोठ्या शहरांत या क्षेत्रात काम करणाऱ्या समलैंगिकांच्या संस्था आणि संघटना याबाबतीत जागरूक आहेत मात्र जे लोक यांचे सदस्य नाहीत, मात्र त्यांचे अनेकांशी संबंध आहेत त्यांना विश्वासात घेऊन याचे गांभीर्य समजावून सांगितले पाहिजे.

सुरेखाताईंसारख्या माताभगिनीना आणि बदनामीचे कलंक सोसत हा लढा जिंकण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकास नमन! एक काळ होता जेव्हा एड्स झालेल्या लोकांना त्यांचे कुटुंबिय रस्त्यावर आणून टाकत असत,समाज नाकाला रुमाल लावून पुढे जायचा कोणी त्यांची दखल घेत नसे! मात्र या हेल्थवर्कर्सनी आणि या स्त्रियांनी त्यात आपलं योगदान दिलं म्हणूनच हा लढा आपण जिंकू शकलो. 

एड्स निर्मूलनात जीवाची बाजी लावणाऱ्या आणि आपलाच बळी देणाऱ्या वेश्यांना याचे साधे श्रेयदेखील आपण दिले नाही इतका आपला समाज कोत्या मनाचा आहे. वेश्या मात्र कोत्या मनाच्या नसतात हे तर याच दशकांत ठळकपणे सिद्ध झालेलं! अलीकडील काळात एड्सबाधित व्यक्तींसाठी काम करणाऱ्या बऱ्याच एनजीओंचे अनुदान रोखून धरणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा व्यक्त कराव्यात हा प्रश्न संताप आणि वेदना देतो! आज 1 डिसेंबर, जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या औचित्याने हे लिहावेसे वाटले. 

- समीर गायकवाड

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar:  22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar:  22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Embed widget