एक्स्प्लोर
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जोधपूर
तुम्ही जोधपूर शहरात पाय ठेवता...अन् कळतं, की आपल्या धकाधकीच्या बेगडी जीवनापेक्षा इथल्या लोकांचं जगणंच जास्त रंगीत आहे. बॅग पाठीवर लटकावून प्लॅटफॉर्मवरुन चालतानाच "जोधपूर स्टेशन पर पधारे सभी यात्रीयों का स्वागत" अशी अनाऊंसमेंट होते...दुसऱ्याच मिनिटाला... "केसरीया बालम..आओंनीसा... पधारों म्हारे देस" चे गहिरे स्वर कानावर पडतात आणि सगळी मरगळ क्षणात दूर होते. मारवाडचं प्रवेशद्वार जोधपूर आपली गळाभेट घेत स्वागत करतं. राजस्थानच्या स्वर्णासमान भासणाऱ्या सोनेरी वाळवंटात नीलम मण्यासारखं चमकणारं हे निळंशार शहर. ब्लू सिटी जोधपूर.

जैसलमेर ते जोधपूर.... थरचं तप्त वाळवंट, मैलोन् मैल झाडांचं आणि माणसांचं अस्तित्वच दिसत नाही, असा हा मरुस्थलाचा प्रदेश.
पुराणातल्या आख्यायिकांनुसार कधाकाळी या वाळवंटात समुद्र होता. प्रभू श्रीरामांनी अग्नीबाण मारल्यानं समुद्राचं वाळवंट बनलं. ज्या जमिनीवर बाजरीशिवाय काहीही उगवत नाही, जिथे वर्षभरात पाऊस झालाच तर तो चुकून एकदा किंवा फारतर दोनदा होतो, पाण्याची पातळी खोल होत जाते, जगण्यात रंगच नाही की काय... असं वाटू लागतं- असा हा प्रदेश! पाच तास ट्रेनच्या प्रवासात अंगावर वाळू साचू लागते, तेव्हा आपल्याला इथल्या लोकांचं जगणं खऱ्या अर्थी उमगत जातं. किती रुक्ष आणि रंगहीन आहे हे जीवन...असं वाटून जातं. आणि मग तुम्ही जोधपूर शहरात पाय ठेवता...अन् कळतं, की आपल्या धकाधकीच्या बेगडी जीवनापेक्षा इथल्या लोकांचं जगणंच जास्त रंगीत आहे. बॅग पाठीवर लटकावून प्लॅटफॉर्मवरुन चालतानाच "जोधपूर स्टेशन पर पधारे सभी यात्रीयों का स्वागत" अशी अनाऊंसमेंट होते...दुसऱ्याच मिनिटाला... "केसरीया बालम..आओंनीसा... पधारों म्हारे देस" चे गहिरे स्वर कानावर पडतात आणि सगळी मरगळ क्षणात दूर होते. मारवाडचं प्रवेशद्वार जोधपूर आपली गळाभेट घेत स्वागत करतं. राजस्थानच्या स्वर्णासमान भासणाऱ्या सोनेरी वाळवंटात नीलम मण्यासारखं चमकणारं हे निळंशार शहर. ब्लू सिटी जोधपूर.
पाच तासांच्या प्रवासानंतर दुपारी बारा वाजता जोधपूरला पोहोचलो. मी प्रवासात खाणं टाळतो. त्यामुळे आता भूक लागली होती. आधी एक रेस्टॉरन्ट शोधलं. स्टेशनपासून जेमतेम शंभर पावलांवरच्या एका रेस्टॉरंटमध्ये मी गेलो. जोधपूरच्या मारवाडी जेवणाचा सुवास तिथे दरवळत होता. त्यामुळे माझी भूक अधिकच खवळली. काही मिनिटांतच समोर गरमागरम बाजरीची भाकरी, कढी, वाटीमध्ये तूप आणि कसलीशी भाजी आली. वेटरला विचारल्यावर त्याने ही पंचकुटाची भाजी असल्याचं सांगितलं. मी नाव ऐकूनच फार न बोलता गपगुमान खायला लागलो. आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा या भाजीची चव निराळीच. एकूणच इथल्या खाण्यात प्रेमाचा गोडवा आणि रखरखत्या उन्हाचा झणझणीतपणासुद्धा आहे. दोन भाकरींचा फडशा पाडल्यावर मनःशांती लाभली.

बाजरीची भाकरी हे मारवाडचं मुख्य अन्न. अत्यंत कमी पाणी आणि भरपूर सूर्यप्रकाशात बहरणारं हे पीक मारवाडसाठी वरदान आहे. १५४३ साली शेहशाह सुरी मारवाड काबिज करण्यासाठी ८० हजारांच्या सैन्यानिशी चाल करुन आला. राजा मालदेव यांचं ५० हजार सैन्य महिनाभर बाजरीची भाकरी आणि बाटी खाऊन मोठ्या जोमाने शेरशाहाच्या सैन्याला धूळ चारत होतं. महिनाभरानंतर शेरशहाचं सैन्य क्षीण झालं. पण युद्धकलेत पारंगत शेरशाहानं एकदाची राठौडांना मात दिली. "खुदा का शुक्र है किसी तरह युद्ध में विजय हासिल हो गई। वरना मैंने तो मुठ्ठी भर बाजरेके कारण हिंदुस्तानकी बादशाहदतही खो दी होती" ही शेरशहाची त्यावेळची प्रतिक्रिया म्हणजे मारवाडच्या बाजरीचा गौरवच आहे.
हातावर बडीशेप घेत गूगल मॅपवर मी माझ्या हॉस्टेलचं म्हणजे मी जिथे राहणार होतो, ते ठिकाण शोधलं. बरोबर दोन किमीचा रस्ता.. पोटभर जेवल्यानं तरतरी आलीच होती. पाच तासाच्या प्रवासाने पायही आखडले होते. म्हटलं, चला 20 मिनिटांत चालत जाऊ.. बॅग पाठीला लटकावली आणि निघालो..
मोठाले रस्ते, शहरात वाहनंच वाहनं अगदी पुण्याची आठवण यावी, अशीच. पण गर्दी फार नाही, शिवाय सिग्नल पाळणारे आणि हेल्मेट कम्पलसरी घालणारे लोक दिसत होते. थोडं पुढे गेल्यावर जोधपूर हायकोर्ट लागलं. सलमान खान इथेच कोर्टाच्या वाऱ्या करत असे. त्याकाळात हायकोर्ट हे लोकांसाठी पर्यटनस्थळच असे. यातला गमतीचा भाग सोडून द्या.
मी एका मोठ्या गेटमधून प्रवेश केला. या गेेटच्या आतमध्ये बाजारपेठ आहे. जुनी घरं आणि गजबजलेलं मार्केट.. या गेटच्या (याला इथे परकोटा म्हणतात) आत जुनं शहर आहे. याच्या बाहेर वाढलं ते नवीन जोधपूर. मी हॉस्टेलवर आलो. हे हॉस्टेल मेहेरानगड किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी होतं. दीड वाजत आला होता. घाईघाईत आवरुन मी रिसेप्शनवर बसेलल्या मुलाला विचारलं " किले पे जाने के लिए रिक्षा मिलेगी ?"
तो म्हणाला "भाईसाहब, पिछेवाली गली से सिधे उपर जाईएं ना। दस मिनट में पोहोच जाओगे." पण मी खरंच खूप दमलो होतो. त्यामुळे रिक्षानेच जावं, असं वाटत होतं. ते ओळखत तो म्हणाला, " रिक्षासे जाना है तो जाईएं लेकिन रिक्षावाले नही आये तो rapido app डाऊनलोड कर लिजिए. बाईकवाले आ जायेंगे और कम पैसे में आपको घुमायेंगे।"
मी तात्काळ rapido app डाऊनलोड केलं. फार वेळ नसल्याने गड चढायला सुरुवात केली. थोडा त्रास झाला पण पोहोचलो. मेहेरानगडावरुन जोधपूर निळंशार दिसतं. इथल्या प्रखर उन्हामुळे या शहराला 'सन सिटी' या नावानेही ओळखलं जातं. उन्हापासून बचावासाठीच इथल्या घरांना निळा रंग देण्याची प्रथा पडली. काही वर्षांतच 'सन सिटी'सोबतच 'ब्लू सिटी' ही जोधपूरची नवी ओळख बनली.

इ.स. 1459 मध्ये राव जोधा यांनी या शहराची पहिली वीट रचली. त्यांच्या नावावरूनच या शहराला जोधपूर नाव पडलं. राजा रणमल यांच्या 25 मुलांपैकी एक होते राव जोधा. जोधपूरचे 15 वे शासक बनल्यावर त्यांना मंडोरचा किल्ला असुरक्षित वाटू लागला. त्यामुळे त्यांनी तात्काळ मंडोरपासून 9 किमीवर एका पहाडावर मेहरानगडाची उभारणी केली.

1459 ला सुरु झालेलं किल्ल्याचं काम महाराज जसवंत सिंह यांच्या कार्यकाळात म्हणजे 17 व्या शतकाच्या मध्यात पूर्ण झालं. 125 मीटर उंचीवर पाच किमी लांब हा भव्य किल्ला एका नजरेत सामावत नाही. किल्ल्याला मुख्य सात दरवाजे आहेत आणि आठवा गुप्त दरवाजा आहे.

मेहेरानगड किल्ला हा राजस्थानच्या सगळ्यात सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे. याच किल्ल्यात मोती महाल, सुख महाल, फुल महाल, शीश महाल आदी अनेक महाल आहेत. नक्षीदार दरवाजे, जाळीदार खिडक्या राजस्थानी कलाकुसरीची परंपरा टिकवून आहेत. किल्ल्यातच भव्य संग्रहालय आहे. यातल्या पालख्या, शस्त्रास्त्रं, राजे - राण्यांची वस्त्रं, इतर वस्तू यातून मारवाडचा इतिहास उलगडत जातो.

मेहेरानगड किल्ल्याची भव्यता आणि राठौडांचं शौर्य गाणारे मंगनीयार (गाणारा आणि वाद्य वाजवणारा समाज) आता बरेच आधुनिक झालेत. आता गाणी हिंदी सिनेमाची जरी वाजत असली तरी त्यांच्या सारंगीतून मारवाडचं मधूर संगीत वाहत असतं. फिरणारी बोटं आणि तारेच्या घर्षणातून निघणाऱ्या त्या स्वरांनी मला बाहेर पडण्याच्या द्वारावर काही काळ खिळवून ठेवलं.
सारंगीवाला
ज्या दरवाजातून आत गेलो, तिथून पुन्हा बाहेर पडल्यावर क्षणभर मी हताश झालो. झालं! वाटलं, आलो या जगात परत. दोन तास डोळे दिपवणाऱ्या महालाची सफर करुन बाहेर आल्यावर असं वाटणं अगदीच स्वाभाविकच होतं.
चार वाजत आले होते. इथून आता उमेद भवनला जायचं होतं. रिक्षावाल्यांना विचारलं, तर ते थेट 200 रुपये सांगत होते. हा पहिल्या दिवसापासूनचा माझा अनुभव होता. रिक्षावाले दीड-दोनशेच्या खाली इथे बोलतच नाही. इथे मला rapido app ची खूप मदत झाली. आपलं आताचं ठिकाण आणि जिथे जायचंय ते ठिकाण सेट करायचं. लगेच आजूबाजूला असलेले रजिस्टर्ड बाईकवाले (rapido app वरचे बाईकर्स... ज्यांचा अॅपवर 'कॅप्टन' असा उल्लेख असतो) आपल्या नंबरवर फोन करतात. एका मिनिटात मला फोन आला. आणि कॅप्टन पाचव्या मिनिटाला समोर हजर झाला. त्याने मला एक हेल्मेट दिलं. फक्त समोरच्यालाच नाही तर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट कम्पलसरी आहे. तिथले लोक हे सगळे नियम पाळतात, हे विशेष! मेहरानगडहून आम्ही बाईकने निघालो. शहरातून सुसाट वेगाने जात असताना माझ्या या सारथ्याशी गप्पाही झाल्या. हा मुलगा एलआयसीची कामं करतो. सोबतच, तो बाईकवरुन फिरवायची कामंही करतो. उमेद भवनबद्दल त्याला विचारल्यावर "मैं वहां कभी नही गयाI" असं प्रामाणिक उत्तर त्याने दिलं. उमेद भवनपर्यंत 39 रुपये बिल झालं. मी त्याला म्हटलं, "अर्धा तास थांब, तू मला इथून परत जसवंत थाडालाही घेऊन जा". तोही तयार झाला. उमेद भवनला 4.30 ला पोहोचलो. 30 रुपयाचं तिकिट काढून मी उमेद भवन पॅलेसच्या आत शिरलो.
उमेद भवन
मेहरानगडापासून सहा किमी अंतरावर चित्तर पहाडावर उभारलेलं हे उमेद भवन जगातल्या सगळ्यांत मोठ्या खासगी महलांपैकी एक! 1943 साली हा पॅलेस बांधून पूर्ण झाला. महाराजा उमेद सिंह यांनी हा पॅलेसला उभारला. म्हणून याचं नाव 'उमेद भवन'! उमेद सिंह यांचे वंशज या पॅलेसचे मालक आहेत. यामध्ये 347 खोल्या आहे. जोधपूरचं ताज हॉटेल याच पॅलेसमध्ये आहे. काही भागात संग्रहालय आहे. इथल्या शोभेच्या वस्तू, वेगवेगळी घड्याळं यांचं सुंदर कलेक्शन पाहण्याजोगं. समोरच विंटेज कारचं प्रदर्शनही आहे. बाहेरुन उमेद भवन मोठं दिसतं, पण यातला खूप कमी भाग पर्यटकांसाठी खुला आहे. त्यामुळे अर्धा पाऊण तासात मी बाहेरही पडलो.
आता मला जायचं होतं, जसवंत थाडाला आणि तिथून परत हॉस्टेलवर. 100 रुपयांत बाईकवाला दोस्त मला हे सगळं फिरवणार होता. हेच जर मी रिक्षाने फिरलो असतो, तर त्याने 300 रुपयांपेक्षा कमी घेतले नसते. अर्थात 100 रुपये ही आमची ऑफलाईन डील होती.
जयवंत थाडा
संगमरवरात बनलेलं शुभ्र जसवंत थाडा ही राजपरिवरातल्या लोकांच्या अंत्यविधीची जागा. महाराजा सरदार सिंह यांनी 1899 साली जोधपूरचे महाराज जसवंत सिंह (दुसरे) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक उभारलं. या आधी राज परिवारातील सदस्याच्या मृत्यूनंतर मंडोरमध्ये अंत्यसंस्कार व्हायचे. हे स्मारक बनवण्यासाठी त्याकाळी जवळपास 3 लाख रुपये खर्च आला होता.
साधारण 6 वाजताच्या संधीप्रकाशात बाईकवाल्या मित्रानं मला परकोटाच्या आतल्या बाजारात सोडलं. जवळच माझं होस्टेल होतं. पण या मार्केटमधे मला फिरायचं होतं. गेटच्या आत आल्यावर मी तिथेच उतरलो.
रात्रीच्या प्रकाशात चमचमणारं घंटाघर आणि भलं मोठ्ठं रंगीबेरंगी मार्केट. अँटिक पीसेस्, शोभेच्या वस्तू, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू यांची रेलचेल होती. एका बाजूला चहा पकोड्यांची हॉटेल्स, हातगाड्यांवरचे पाणी पतासे (पाणी पुरी), एकूणच मजाच मजा...
मी राजस्थानला जाणार म्हटल्यावर माझ्याकडे आधीच बांधणी दुपट्टा, बांधणी साडी, लहेरीया दुपट्टा, हाताने विणलेले दुपट्टे याची फर्माईश आलेली होतीच. आता ही सगळी यादी कुणाकुणाची आहे ते मी सांगणार नाही. काही गोष्टी सिक्रेट बऱ्या असतात.
बांधणी दुपट्टा हा एका धाग्यामध्ये बांधून ठेवलेला असतो. दुकानदारानं मोठ्ठ्या गठ्ठ्यातून एक दुपट्टा काढला. माझ्यासमोरच त्यानं ते धागे केळ्याची साल काढावी, तसे एकमेकांपासून तोडले. माझ्याकडे बघत हसून म्हणाला "इसे कहते है बंधेज का जादू..."

दुपट्टे आणि साड्यांसोबतच बंद गळ्यांचे कोट ही जोधपूरची खरी ओळख. आपल्याकडे लग्नात जोधपुरी कोट मोठ्या हौशीनं घातला जातो. शिवाय जोधपूरच्या चादरीही प्रसिद्ध आहेत. ओझं सोबत घेणं मला शक्य नव्हतं, त्यामुळे मी तो मोह टाळला.
मार्केटमधून बाहेर पडतानाच बाजूला पानी पतासेवाला होता. इथल्या पाणी पुरीच्या पुऱ्या या खास गव्हाच्या पिठाच्या असतात. जाड आणि तेवढ्याच चवदारही. मुंबईत मिळणारी पुरी ही मैद्याची आणि पातळ असते. इथला पाणीपुरीतला चाट मसाला तर अप्रतिमच. विशेष म्हणजे त्याने एकामागोमाग एक 9 पुऱ्या दिल्या. माझंं पोट अगदी भरायलाच आलं होतं. मला वाटलं, किमान आता हा किमान 30 रुपये घेईल. मी 50 ची नोट त्याच्या हातात दिली. त्याने चक्क मला 40 रुपये परत दिले. 10 रुपयात पोटभर पाणीपुरी.. त्यामुळे पुन्हा जोधपुरला येण्याचं एक कारणच मला मिळालं "पाणीपुरी".
जोधपूरची खास ओळख इथली मावा कचोरी. ही प्रचंड गोड असते. मी गोड फार खात नाही, पण जोधपूरला आल्यावर मावा कचोरी तर खाल्लीच पाहिजे. पाणीपुरीवाल्याला विचारल्यावर त्याने समोरच्या चौकात मावा कचोरी मिळते, असं सांगितलं. न राहवून मी ते दुकान गाठलंच.
सौ. फेसबुक
साजूक तुपात तळलेली कचोरी भल्यामोठ्या पाकाच्या पातेल्यात बुडवून बाहेर काढतात आणि मध्ये छेद देऊन त्यावर ड्रायफ्रूट्स टाकून देतात. एकच कचोरी मला पुरे झाली होती. पण प्लेटमध्ये दोन होत्या, म्हणून मी दुसरीही संपवली. तिथून बाहेर पडलो, तेव्हा नऊ वाजून गेले होते. बाहेर दुकानांची आवराआवर सुरु झाली होती. दिवसभर मस्त फिरल्याचं आणि महत्वाचं म्हणजे. खरेदी उत्तम झाल्याचं समाधान होतं. हॉस्टेल गाठून बॅग पॅक करुन झोपलो. कारण उद्या सकाळीच पुष्करसाठी निघायचं होतं.
सकाळी मी जोधपूर स्टेशन गाठलं. जोधपूर - इंदोर गाडी बरोबर 7.20 मिनिटांनी निघाली. अरवलीच्या पर्वतात वसलेल्या उदयपूर, माऊंट अबूनंतर जैसलमेरचं थर वाळवंट तिथून मारवाडी जोधपूर. आता पुन्हा जोधपूरवरुन अरवलीच्या पर्वतरांगांत मी प्रवेश करत होतो. एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचं समाधान मनात भरुन आलं होतं...
---------------------------
आजचा खर्च
दुपारचं जेवण - 120 रु
मेहेरानगड किल्ला बघण्याचं तिकिट -100 रु
उमेद भवन बघण्याचं तिकिट 30 रु.
बाईक भाडं - 100 रु.
खरेदी - 1400 रु.
रात्रीचं खाणं - 100 रु.
------------------------
एकूण - 1850 रु.
------------------------
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
ट्रेंडिंग न्यूज























