कोरोना काळात फिट राहायचं तर शरीर तंदुरुस्त आणि रोगप्रतिकारकशक्ती व्यवस्थित असली पाहिजे हे एव्हाना सगळ्यांनाच कळून चुकलंय. या रोगट वातवरणात स्वतःला सांभाळण्याकरिता अनेकांनी आयुर्वेदिक आणि युनानी काढ्यांपासुन, विविध फळाचे रस आणि व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा आधार घेतला आहे. त्यातच जिम बंद असल्याने घरच्या घरी जमेल त्या पद्धतीने योग आणि व्यायामास सुरुवात केली आहे. घरी व्यायाम करून कंटाळा आल्याने आता लोकांनी चालण्यावर भर दिला आहे. कोरोनाच्या पूर्व काळात ज्यांनी व्यायामाचा कंटाळा येत होता आज तेच लोक हिरारीने त्यांच्या शरीराला आकार देण्याच्या प्रकारात उतरले आहेत. अद्रकाप्रमाणे कशीही शरीराची वाढ होऊ देणारे तो आकार आटोक्यात ठेवण्यासाठी घामाच्या धारा गाळताना चोहोबाजूकडे दिसत आहे. ज्या पद्धतीने कोरोनाच्या या काळात आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे ते खरेच कमालीचे आहे. विशेष म्हणजे या काळात अनेकांनी नवीन सायकल विकत घेऊन नित्यनियमाने घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या तर अधिकच वाढली आहे. खासकरून शहरातील वातावरणात सायकलवारी करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. हा बदल सध्याच्या घडीला छोटा वाटत असला तरी भविष्यातील संभाव्य धोके ओळखून आरोग्य साक्षरतेच्या नांदीची सुरुवात म्हणावी लागेल.


ज्या पद्धतीने आणि वेगाने शहरातील नागरिक सायकल विकत घेत आहेत. त्या तुलनेने भविष्यात मुंबई सारख्या शहरात लवकरच सायकलसाठी वेगळे ट्रॅक निर्माण करावे लागतील अशी वर्तविली जात आहे. सायकलसाठी खरं तर वांद्रे-कुर्ला संकुलात ट्रॅक बनविले गेले होते मात्र त्याचा वापर करताना फारसे कुणी दिसले नाही. मात्र या कोरोनाकाळात नागरिक स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेगळा असा वेळ काढून कसरती करताना दिसत आहे. त्यात सायकलिंग करणे हा प्रकार बऱ्यापैकी नागरिक करताना दिसत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वच जण सायकल चालविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. सकाळी अचानकपणे मोठा सायकलवीरांचा तांडा रस्त्यावर जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच्या काळातील मागे बसण्यासाठी सीट असणाऱ्या सायकल नाहीत या खास क्रीडाप्रकारच्या सायकल असून नागरिक या प्रकारातीलच सायकल घेऊन रस्त्यावर बाहेर पडत आहेत. परदेशात ज्या पद्धतीने सायकलिंगला महत्त्व आहे त्यासारखे चित्र शहरात भविष्यात दिसले तर नवल नको.


वैद्यकीय शास्त्रानुसार सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक वेळा डॉक्टर मंडळी सायकल चालविण्याचा सल्ला देत असतात. याप्रकरणी औरंगाबाद येथील एम जी एम रुग्णलयातील अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ गिरीश गाडेकर सांगतात की, " कोरोना काळातील हा एक खूप सकारात्मक झालेला बदल संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरात दिसत आहे. अनेक ठिकाणी आज पहिले तर नागरिक सायकलिंग करताना दिसत आहेत. लोकांना आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. सायकलिंग हा प्रकार संपूर्ण शरीरासाठी लाभदायक असा प्रकार आहे. नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. त्याचबरोबर पायातील स्नायूमध्ये ताकद निर्माण होते, गुडघ्यांमधील (मोबिलिटी) मोकळीकता वाढते. गुडघे दुःखींच्या व्याधींपासून लांब राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे वजन वाढत नाही, दिवसभर माणूस प्रफुल्लित राहण्यास मदत होते. त्याशिवाय पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. सायकल चालवल्याने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो. याचा फायदा आरोग्याला होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. त्यांच्यासाठी सायकलींग हा एक सोपा उपाय आणि व्यायामही आहे."


ते पुढे असेही सांगतात की, " आपल्याकडे सर्वच कार्यालयातील काम करणाऱ्या कार्यालयात येण्यासाठी सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्या रुग्णलयात जे कुणी सायकल चालवून येतात अशा लोकांसाठी विशेष अशी पार्किंगची सोया उपलब्ध करून दिली आहे. यामुळे इंधन तर वाचतेच शिवाय कामगार तंदुरुस्त राहतात त्याचा परिणाम थेट त्याच्या कामावर जाणवतो, असे अनेक विविध फायदे सायकलिंगचे आहेत.


सायकल चालविण्याची क्रेझ मध्ये - मध्ये येत असते आणि जात असते असे आपण सगळ्यांनीच पहिले आहे. मात्र यावेळीचे सायकल चालविण्याचे वेड नसून नागरिक स्वतःच्या आरोग्यासाठी लोक सायकल चालवीत आहेत. काही दिवसांनी सायकलिंगचे नवीन ग्रुप पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही. विशेष म्हणजे सायकल घेणे आता स्वस्त प्रकार राहिलेला नाही. सायकलिंग करणारे किमान 10 हजार रुपये किमतीपासून ते मग पुढे ही किंमत त्या ब्रॅण्डनुसार ठरत असते. त्यात गिअरची सायकल घेणारे अनेक आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे सायकलिंग करणे स्टेटस सिम्बॉल होऊ पाहत आहे. पूर्वी काही जण नियमितपणे जिमला जाणारे दिसत होते आता मात्र बहुतांश सायकल चालविण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सायकल चालवताना हेल्मेट घालावे असा प्रघात आहे, मात्र आपल्याकडे असे करताना फार क्वचितच नागरिक आढळत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


सातारा हिल्स हाल्फ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ संदीप काटे सांगतात कि, " हे खरंय कि कोरोनाच्या या काळात सायकलिंग या प्रकाराला बऱ्यापैकी प्राधान्यता दिली आहे. लॉकडाऊनमध्ये घरी व्यायाम करून कंटाळले होते. मात्र लोकांना मोकळीक मिळाली त्यावेळी लोकांनी सायकल चालविण्यास पसंती दिल्याचे पाहायलं मिळत आहे. लवकरच या सायकल चालविण्याची नवीन एक चळवळ उभी राहू शकते आणि ती हिताकरिता असेल. सायकल चालविणे खरंच व्यायामाचा उत्तम प्रकार आहे. आमच्या साताऱ्यामध्ये वेगवेगळे ग्रुप आहेत. या काळात नवीन सायकल चालवणाऱ्याचे प्रकार वाढले आहे यामध्ये कोणतेही दुमत नाही.


तर सायकल चालविण्यामुळे ज्या पद्धतीने फायदे आहेत त्याचप्रमाणे शाररिक क्षमतेपेक्षा अधिक सायकल चालविल्याने त्रासही होऊ शकतो. याप्रकरणी डॉ.सुदीप काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) परिषद, सांगतात की, " गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात नागरिक सायकलिंग करताना दिसत आहे. मात्र क्षमतेपेक्षा अधिक सायकल चालविल्याने हृदयाशी निगडित आणि स्नायूंच्या वेदना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकं मास्क लावून सायकलिंग करत असतात, तसे संभवू शकतात. त्यामुळे सायकल चालविण्यापूर्वी एकदा फिजिओथेरपी तज्ज्ञ किंवा फिजिशियनचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आपल्या शाररिक क्षमतेपेक्षा एखादी गोष्टीचा अतिरेक केला तर त्रास हा होऊ शकतो त्यामुळे काळजी घेऊन सायकल चालविण्यास काहीच हरकत नाही. "


ग्रामीण भागात पूर्वी बऱ्यापैकी सायकलचा वापर करीत असत मात्र सायकलची जागा आता दुचाकीने घेतली आहे त्याउलट शहरात आता लोकांना सायकलिंगचे फॅड निर्माण झाले आहे. मात्र हे फॅड नागरिकांच्या आरोग्यसाठी फायद्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. मात्र नागरिकांचं हे सायकलिंगचं खूळ असंच टिकलं पाहिजे आणि भविष्यात सायकलस्वारांचा मेळावा शहारा-शहरात आयोजित केल्याचे लवकरच चित्र पाहायला मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग