एक्स्प्लोर
अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स
अल्ताफ राजाचा भारताच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात जो 'कल्ट' आहे. हा त्या भागात राहिलेल्या माणसालाच कळू शकतो. म्हणून गावाकडं राहणारा माणूस उपजीविकेसाठी किंवा शिक्षणासाठी शहरात स्थलांतरित होतो , तेव्हा मोठ्या शहरात अल्ताफ राजाच नाव काढताच लोक एक तर हसतात किंवा तुच्छतादर्शक नाक मुरडतात, तेव्हा त्याला आश्चर्य वाटत. मग तो सरावतो आणि अल्ताफ राजाची गाणी प्लेलिस्टमध्ये अॅड करतो.

वरुण धवनचा 'ऑक्टोबर' नावाचा सिनेमा येत आहे. शुजीत सरकार दिग्दर्शन करत असलेला हा सिनेमा एक हळुवार प्रेमकहाणी आहे. तर वरुणने ट्विटरवर सिनेमाचं प्रमोशन करताना काही दिवसांपूर्वी अल्ताफ राजाच्या 'तुम तो ठेहरे परदेसी' गाण्यातल्या ओळीचा चपखल वापर केला होता. 'ऑक्टोबर आ गया था दुनिया बदल चुकी थी, मौसम बदल चुका था, नवंबर आ चुका था' ही ती ओळ. वरुण धवनच्या या कृतीने बहुतेक लोकांच्या विस्मृतीमध्ये गेलेला अल्ताफ राजा काही काळासाठी का होईना लोकांना आठवला. अनेकदा एखाद्या कलाकाराचं मूल्यमापन करताना त्याची गुणवत्ता, त्याच्या कलाकृतीचा दर्जा या गोष्टींचा विचार करताना त्याच्या एका पिढीवरच्या आणि एका विशिष्ट प्रतलातल्या प्रभावाचा विचार पण करावा असं मला वाटत. कारण एखाद्या कलाकाराचा दर्जा ही सापेक्ष गोष्ट आहे. काहीजणांना तो आवडू शकतो, तर काही जणांना आवडत नाही. याला कुठलाच कलाकार अपवाद नाही. पण कलाकाराचा प्रभाव तुम्ही नाकारू शकत नाही. अल्ताफ राजा हा एक असाच गायक कलाकार आहे.
अल्ताफ राजाचा भारताच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात जो 'कल्ट' आहे. हा त्या भागात राहिलेल्या माणसालाच कळू शकतो. म्हणून गावाकडं राहणारा माणूस उपजीविकेसाठी किंवा शिक्षणासाठी शहरात स्थलांतरित होतो , तेव्हा मोठ्या शहरात अल्ताफ राजाच नाव काढताच लोक एक तर हसतात किंवा तुच्छतादर्शक नाक मुरडतात, तेव्हा त्याला आश्चर्य वाटत. मग तो सरावतो आणि अल्ताफ राजाची गाणी प्लेलिस्टमध्ये अॅड करतो. मी स्वतः परभणीसारख्या निमशहरी भागातून आलो आहे. अल्ताफ राजा काही माझा आवडता गायक नाही. पण त्याचा परभणीसारख्या भागात जो एक प्रभाव आहे, त्याचा मी साक्षीदार आहेच. आणि हो मी अल्ताफ राजाची गाणी कधी कधी ऐकतो, याचा मला काहीही गंड नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळून 1997 साली 50 वर्ष झाली. योगायोगाने त्याच वर्षी निमशहरी आणि ग्रामीण भागात सामाजिक भूकंप घडवणाऱ्या दोन घटना घडल्या. पहिली म्हणजे 'राजा हिंदुस्थानी' प्रदर्शित झाला. त्यातल्या आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या पावसातल्या दीर्घ चुंबनदृष्याने अनेक मुलं-मुली एका रात्रीत वयात आली. चुंबन हे असं पण असत हे अनेकांना नव्याने कळलं. दुसरं म्हणजे त्याच वर्षी अल्ताफ राजाचा 'तुम तो ठेहरे परदेसी' अल्बम मार्केटमध्ये आला.
आमच्या परभणीमध्ये दरवर्षी उरूस भरतो. तिथं पूर्ण परभणी आणि आजूबाजूच्या तालुक्यांमधली आणि खेड्यांमधली जनता लोटते. हा उरूस अनेक बाबतीत ट्रेंड सेटर आहे. उरुसामध्ये जी गाणी जोरात वाजतात, ती गाणी वर्षभर आमच्या भागात जोरदार चालणार, असं सरळ साधं समीकरण आहे. तर त्यावर्षीच्या उरुसामध्ये 'तुम तो ठेहरे परदेसी'ने धुमाकूळ घातला. आणि संगीताच्या प्रांगणात अल्ताफ राजा नावाचा कुणी नवीन तारा उदयाला आला आहे, याची आमच्यापुरती द्वाही फिरवली गेली. म्हणजे त्या वर्षी असं एक पण लग्न नसेल ज्या लग्नात हे गाणं वाजलं नसेल. एक पण भीम जयंतीची आणि शिव जयंतीची मिरवणूक नसेल ज्यात या गाण्यावर कार्यकर्ते पोर नाचले नसतील. गणपतीमध्ये पण याच गाण्याचा जन्म होता. असं भाग्य फार कमी गाण्यांना मिळतं. 'तुम तो ठेहरे परदेसी'च्या अल्बमची ग्रामीण आणि निमशहरी भागात रेकॉर्ड तोड विक्री झाली.
अल्ताफ राजाचा जन्म नागपूरचा. राजाचा जन्म ज्या परिवारात झाला, तो व्यावसायिक कव्वालांचा होता. लहान वयातच राजाच संगीत शिक्षण सुरु झालं. आपल्याला व्यावसायिक कव्वाल व्हायचं आहे, हे राजाने लहानपणीच ठरवलं होत. जेव्हा राजा कव्वाल बनला, तेव्हा इंडी पॉप सिन एकदम जोरात होता. राजा इंडी पॉपच्या लोकप्रियतेच्या लाटेवर सवार झाला. 'तुम तो ठेहरे परदेसी'च्या प्रचंड यशानंतर राजाला बॉलिवूडकडून ऑफर्स येणं स्वाभाविकच होतं. राजाला आपल्या श्रोत्याची जबरदस्त सामाजिक जाण होती. त्याने निवडलेले सिनेमे त्याच्या या जाणतेपणाची साक्ष होते.
त्यावेळेस मिथुन चक्रवर्ती आणि टी. एल. व्ही. प्रसाद ह्या अभिनेता दिग्दर्शक जोडीचे सिनेमे ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या थिएटर्समध्ये तुफान चालत होते. या चित्रपटाचा दर्जा काय होता, हे अर्थातच सांगायची गरज नाही. या चित्रपटांना कुठल्याही वैश्विक जाणीवा नव्हत्या. चित्रपट माध्यमांची सामाजिक जबाबदारी वैगेरे, शब्दबंबाळ गोष्टींशी त्यांचा दुरान्वये संबंध नव्हता. आपल्या प्रेक्षकाला काय पाहिजे ते द्यायचं आणि नफा कमवायचा या निव्वळ व्यावसायिक उद्देशातून हे सिनेमे बनत होते. यातल्या बहुतेक चित्रपटात मिथुन एक तर प्रामाणिक सरकारी अधिकारी असे किंवा श्रमजीवी वर्गातला (मिथुनचा मोठा चाहतावर्ग यातलाच आहे) असे. सर्व पात्र काळ्या आणि पांढऱ्या रंगात असत. नायिका बहुतेक आखीव, रेखीव आणि भरीव अशी दाक्षिणात्य अभिनेत्री असे. काळी कृत्य करणाऱ्या खलनायकाचा एकदा नायकाने एकहाती नि:पात केला की, चित्रपटाच सुप वाजत असे आणि प्रेक्षक पैसे वसूल झाले, या कृतार्थ भावनेने बाहेर पडत असे. या सिनेमांची गाणी पण पिटातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केली जात. बहुतेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक आनंद-मिलिंद असत. अल्ताफ राजा पण त्यांच्या टीममध्ये सामील झाला. त्याच याच टीमच्या 'शपथ' मधलं' थोडा इंतजार का मजा लिजिये' गाणं पण तुफान हिट झालं. 'चांडाल' , 'हिटलर' आणि इतर काही चित्रपटांसाठी अल्ताफने गाणी गायली.
अल्ताफची लोकप्रियता एवढी होती की, रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाला पण त्याचा आवाज आपल्या चित्रपटात वापरण्याचा मोह आवरला नाही.'तुमसे कितना प्यार है' हे 'कंपनी' मधलं गाणं खरंतर अल्ताफ राजा ज्या प्रकारच्या कॅची गाण्यांसाठी ओळखला जातो, त्या प्रकारचं गाणं नाही. अतिशय इंटेन्स गाणं आहे. पण अल्ताफने त्या गाण्याला सुंदर न्याय दिला आहे. इम्रान हाश्मी आणि विद्या बालनच्या 'घनचक्कर' सिनेमातलं त्याच गाणं गाजलं. 'हंटर' हा नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या तरुणाच्या लैंगिक प्रवासाचा लेखाजोखा मांडणारा एक अप्रतिम आणि दुर्लक्षित सिनेमा. त्या सिनेमात अल्ताफ राजाचा आवाज वापरण्यामागे दिग्दर्शकाचे काही आडाखे होते. 'हंटर' मधलं अल्ताफ राजाच 'दिल लगाना' गाणं पण गाजलं. पण खरं सांगायचं, तर राजाच्या पहिल्या अल्बमला जेवढं यश मिळालं तेवढं त्याच्या इतर कामाला मिळालं नाही.
अल्ताफ राजाने एका अशा पिढीचं पालनपोषण केलं आहे, जिच्या गाणी ऐकण्याच्या आणि जगण्याच्या काळात आय पॅड, स्मार्टफोन, एम पी थ्री या गोष्टींचा शोध पण लागला नव्हता. त्यांच्यासाठी गावातली कॅसेटमध्ये गाणी भरून देणारी दुकान हाच गाणं शोधण्याचा एकमेव स्रोत होता. कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अलका याज्ञिक, फाल्गुनी पाठक ही अजून अशीच काही मंडळी. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या-वाढलेल्या पिढीच्या सांगीतिक भरणपोषणाचं काम या मंडळींनी केलं. अल्ताफ राजा हा आता लोकांच्या विस्मृतीमध्ये गेला असला, तरी त्याच स्वतःच असं सामाजिक आणि नॉस्टॅल्जीक मूल्य आहे. हा लेख अशाच एका अल्ताफ राजा युगाची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे.
संबंधित ब्लॉग
राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व
सौंदर्यवती : सोनाली बेंद्रे
ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक
ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है
तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला
चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट
सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन
नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल
गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू
जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा
जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या
एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!
ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा
एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?
जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान
अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका
गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट
श्रीदेवी नावाचं फेनॉमेन
कुमार सानू -एका दशकाचा आवाज (1)
View More
























