एक्स्प्लोर

दिल से : नोव्हेंबरच्या सकाळी पडलेलं गर्द धुकं

आपण सगळेच विरोधी विचारसरणीवर टोकाचे ठप्पे मारून त्यांना अडगळीत टाकण्यात वाकबगार असतो. बहुदा तो मूळ समस्येपासून दूर पळण्याचा एक मार्ग असतो. एखादी विचारप्रणाली, इझम, धर्म किंवा समूह कितीही हिणकस कृत्य करत असला तरी त्यांची स्वतःची जी एक बाजू असते ती समजावून घ्यायला हवी. मग अनेक प्रश्नांची उत्तर मिळायला लागतात. हिटलरने एवढा अमानुष नरसंहार का केला? नथुरामने महात्म्याला गोळी का घातली? कसाबच्या डोक्यात थंडगारपणे लोकांना मारण्याइतपत धर्माचं विष का भिनलं? राजीव गांधींची हत्या करण्यापूर्वी सुसाईड बॉम्बर धनुच्या डोक्यात नेमकं काय चालू होतं? तिरस्कार करून, समस्येकडे डोळेझाक करून या प्रश्नांची उत्तर मिळण्याची शक्यता नसते. त्यासाठी या लोकांच्या बुटात पाय घालून त्यांच्या बाजूने जगाकडे बघता यायला पाहिजे . जेणेकरून या प्रश्नांची उत्तर मिळतील आणि पुढे अशा घटनांना पायबंद घालता येईल. पण असं केल्यावर मिळणारी उत्तर आपल्याला न आवडणारी पण असण्याची शक्यता असतेच. वर्षानुवर्षे आपण डोक्यात जपलेल्या संकल्पनांना सुरुंग पण लागू शकतो. 'दिल से' हा अशाच काही अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांची उकल करण्याचा प्रयत्न करतो. 'दिल से'चा जॉनर कुठला असा प्रश्न चार लोकांना विचारला तर चार वेगवेगळी उत्तर मिळण्याची शक्यता आहे. एकाचं उत्तर असू शकतं रोमान्स, दुसऱ्याचं उत्तर असू शकतं ड्रामा, एखाद्याला तो पॉलिटिकल थ्रिलर वाटू शकतो आणि उत्तर देणारा चौथा माणूस जर मणिरत्नम असेल तर तो नेहमी हसतो तसं ओठांच्या कोपऱ्यांनी हसून प्रश्नाकडे दुर्लक्ष करेल. 'दिल से'चं प्रमोशन हा एक 'कामूफ्लाज'चा प्रकार होता. ट्रेलर -गाणी बघून कुणालापण 'दिल से ' हा टिपिकल रोमँटिक चित्रपट वाटू शकला असता. भरीस भर म्हणजे चित्रपटात नायक होता शाहरुख खान. ज्याच्याबद्दल असं बोललं जातं, की हा मोठ्या पडद्यावर निर्जीव खुर्चीसोबत पण तितकाच इंटेन्स रोमान्स करू शकतो. मणिरत्नम हा इसम काय प्रतीचा दिग्दर्शक आहे हे ओळखणारे लोक मात्र जाणून होते की आतापासून आडाखे बांधण्यात काही अर्थ नाही. चित्रपट बघू तेव्हा कळेलच. ते लोकच बरोबर निघाले. जे थोडेफार लोक चित्रपटगृहात गेले त्यांना लक्षात आलं, की या चित्रपटाला कुठल्यातरी जॉनरच्या भिंतीत अडकवण्याची गरजच नाही. ह्या चित्रपटात एक अप्रतिम प्रेमकहाणी आहे . पण ती कुठल्या ट्युलिपच्या शेतात घडत नाहीये की भन्साळीच्या चित्रपटांसारख्या मोठमोठ्या हवेल्या -राजवाड्यांमध्ये पण घडत नाही. ही प्रेमकथा आपल्याच देशाच्या एका अस्वस्थ, दुर्लक्षित आणि खदखदणाऱ्या तुकड्यावर आकाराला येत आहे. त्याअर्थाने नायिकेला आपलंसं करू पाहणारा नायक हा अस्वस्थ, उर्जावान, गोंधळलेला आणि समोरच्याची बाजू समजून घेण्याची इच्छा असणारा आहे. अगदी उदारीकरणाच्या नंतर पुनर्जन्म झालेल्या भारतासारखा. मेकअप शिवाय पण अतिशय सुंदर दिसणारी पण आतून तितकीच खदखदत असणारी नायिका आहे. अगदी ईशान्य भारतासारखी. त्या अर्थाने ही फक्त दोन माणसांची प्रेमकथा नाही. त्याला अनेक प्रतीकात्मक वैश्विक संदर्भ आहेत. ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करणारा अमरकांत वर्मा (शाहरुख) दिल्लीमधून आसामला पदभार स्वीकारायला चालला आहे. थेट देशाच्या राजधानीमधून देशातल्या सगळ्यात दुर्लक्षित भागाकडे चालला आहे. ईशान्येतल्या कुठल्यातरी आडवाटेवरच्या रेल्वे स्टेशनवर एका पावसाळी रात्री आपल्या गाडीची वाट बघत आहे. सुसाटलेल्या वादळात त्याला सिगारेटची तलफ लागलीये. पण माचीस नाही. तिथे कोपऱ्यात कुणीतरी कंबल गुंडाळून पडलंय. अमर त्या आंगतुकाकडे माचीस मागायला जातो. बऱ्याच मिनतवाऱ्या करतो. इतक्यात हवेचा जोरदार झोका येतो आणि त्या आगंतुकाच्या अंगावरच कांबळ उडतं. त्यातून एक सुंदर चेहरा डोकावतो. तो तिला पहिल्यांदा बघतो आणि पहिल्या नजरेतच अमरला प्रेम होतं. मग सुरु होते अमरची फ्लर्टिंग. एकदम शाहरुख स्टाईल. कंटाळून ती मुलगी त्याला चहाचा एक कप आणायला सांगते. अमर लगेच पळत पळत जाऊन म्हाताऱ्या चहावाल्याला उठवतो. लाख मिनतवारी करून त्याला चहा बनवायला लावतो. जोपर्यंत तो चहा घेऊन येतो तोपर्यंत 'ती ' गायब झाली असते. ती जाते पण अमरला चुटपुट लावून जाते. अमरच्या शब्दात सांगायचं तर 'दुनिया की सबसे छोटी लव्ह स्टोरी ' सुरु होण्यापूर्वीच संपली. पण हा भ्रम असतो. ती आसाममध्ये त्याला पुन्हा भेटते. प्रफुल्लित झालेला अमर पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण ती त्याला साफ झिडकारते. आपण कधी एकमेकांना भेटलोच नाहीत असं सांगते. अमरला तिच्या वागणुकीचं आश्चर्य वाटतं. बाईभोवती जे गूढपणाचं आवरण असतं त्याचं पुरुषांना फार आकर्षण असतं.  अमर पण त्याला अपवाद नसतो. त्याचं तिच्याबद्दलच आकर्षण वाढतच जातं. नियतीचा जोर असा, की दोघे पुन्हा एकमेकांसमोर येतात. अमर पुन्हा तिला गाठतो. "माझं तुझ्यावर प्रेम आहे." तो आर्जव करतो. ती त्याला सांगते, माझं लग्न झालं आहे. माझा पिच्छा सोड. अमर मानत नाही. तितक्यात तिचे दोन साथीदार येतात. अमर बेशुद्ध होईपर्यंत त्याला बेदम मारहाण करतात. अमर आता दिवानगीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ज्याला उर्दूमध्ये 'उन्स' म्हणतात. नाना हिकमती करून अमर तिचे डिटेल्स मिळवतो. ती लडाखला असते. अमर त्या शुभ्र सौंदर्याच्या प्रदेशात पोहोचतो. तिथे तीच त्याला गाठते. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चक्क अमर आपला पती असल्याची बतावणी करत. तिच्याबाबत बऱ्याच गोष्टी शंकास्पद आहेत हे एव्हाना अमरला कळलेलं असतं. पण तिच्या प्रेमातून बाहेर पडणं आता त्याला शक्य नसतं. तो हतबल असतो. तो तिने तयार केलेल्या भ्रमामध्ये पण खुश असतो. पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले झूठा ही सही. ती त्याला आपलं नाव सांगते मेघना. ते नाव तरी खरं आहे की नाही काय माहित? दोघे आपण नवरा-बायको आहोत असं समजण्याचा खेळ खेळतात. आपलं घर कसं असेल? आपल्याला किती मुलं असतील? त्यांची नाव काय असतील? अशा न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसतात. मेघना पण या खेळात खुलते. तिची मानवी बाजू समोर पहिल्यांदाच येते. दुसऱ्या दिवशी तो उठतो तेव्हा मेघना पुन्हा गायब असते. हा पाठशिवणीचा खेळ अजून किती वेळ चालणार? अमरचं हृदय विदीर्ण होतं. अमरच्या घरचे अमरचं लग्न ठरवतात. मेघना आता वापस येणार नाही असा समज अमरने करून घेतलेला असतो. अमर पण प्रीती नायरशी (प्रीती झिंटा) लग्नाला तयार होतो. प्रीती सुंदर, आत्मविश्वासाने भरलेली, बबली मुलगी असते. पण ती मेघना नसते. इतक्यात पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी मेघना पुन्हा अमरच्या घराचा दरवाजा ठोठावते. आश्रयासाठी. मेघना अमरला सांगते, की ती एक सुसाईड बॉम्बर आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीत जो सोहळा होणार असतो त्यात बॉम्बस्फोट घडवण्यासाठी ती आली आहे. लहानपणी भारतीय लष्कराकडून तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी ती हे कृत्य करणार असते. या मिशनमुळेच ती अमरच्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नसते. अमरवर प्रेम असून पण. अमर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो यशस्वी होतो का? काय किंमत देऊन? हे पडद्यावरच बघायला पाहिजे. एवढंच सांगतो हुब (आत्मघात ) हा प्रेमकथेचा शेवटचा टप्पा असतो. पतंग ज्योतीवर झेप घेऊन आपला प्रवास संपवतो. त्याप्रमाणे. ‘दिल से’च्या ‘सतरंगी रे’  या गाण्यात त्याच्या थीमची तात्विक बैठक आहे... प्रेमाच्या सात छटा, उन्स ते हुब (बहुतेक) हा आत्मघाताचा, पतंगाने ज्योतीवर झेप  घेऊन संपून जाण्याचा प्रवास या सिनेमात भलत्याच अप्रतिमपणे साकारला होता . या छटा दाखवण्यात रेहमानच्या गाण्यांचा मणिरत्नमच्या दिग्दर्शनाइतकाच मोठा वाटा होता. पहिल्या प्रेमाची खुमारी दाखवणार 'छ्य्या छ्य्या', 'प्रेमाची अध्यात्मिक डूब दाखवणार 'थैय्या थैय्या', प्रेमातली आर्तता दाखवणारं 'ए अजनबी', 'इष्कातली इंटेन्सिटी दाखवणार 'दिल से रे ' आणि प्रेमाच्या छटा दाखवणार 'सतरंगी रे'.. तेही बाहो मे उलझा उलझा हूँ, तेरी चाहो मे उलझा उलझा.. सुलझाने दे होश मुझे तेरी राहों मे उलझा हूँ... ह्या सतरंगी गाण्यातल्या दोन ओळींमधे ह्या आत्मा कैद आहे . शेवटपर्यंत नायकाला प्रेमात शुद्दीवर यायचं नाहीच किंवा त्याला भानावर यायचंच नाहीये. त्या अर्थाने 'दिल से' हा जितका मणिरत्नमचा तितकाच रहमान या जिनियसचा . देशातलं सर्वोत्तम टॅलेंट या चित्रपटासाठी एकवटलं होतं. क्रेडिट्स बघा. गुलजार, मणिरत्नम, श्रीधर, रेहमान, संतोष सिवन, शाहरुख, मनीषा, तिगमांशू धुलिया, शेखर कपूर, रामू... तरीही चित्रपट तिकीटखिडकीवर दणकून आपटला. प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला. चित्रपटाचं प्रमोशन हा' कामूफ्लाज' होता. छय्या छय्या गाण्यामुळे आणि ट्रेलर्समुळे हा चित्रपट एक निखळ प्रेमकथा आहे असा समज प्रेक्षकांचा झाला होता. थिएटरमध्ये पडद्यावर आसाम प्रश्न, लष्कराचे अत्याचार, सुसाईड बॉम्बर्स असे घटक दिसल्यावर वेगळ्याच अपेक्षेने आलेल्या प्रेक्षकांचा दारुण अपेक्षाभंग झाला. चित्रपटाची अतिशय वाईट माऊथ पब्लिसिटी झाली. चित्रपट आपटला. 'दिल से'चं वैशिष्ट्य म्हणजे सुसाईड बॉम्बरच्या बुटात पाय घालून त्याच्या बाजूने विचार करणारा हा चित्रपट. कर्कश आवाजात देशप्रेम सिद्ध करणाऱ्या चित्रपटांची मोठी परंपरा असणाऱ्या देशात हा वेगळाच प्रयोग असतो. एखादा माणूस प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध उभे राहून सुसाईड बॉम्बर का बनतो याचा थांग घेण्याचा प्रयत्न मणिरत्नम या चित्रपटातून करतो. संतोष सिवनने काही वर्षांपूर्वी महिला सुसाईड बॉम्बरच्या हळुवार बाजूचा वेध घेणारा 'टेररिस्ट' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यात आयेशा धारकरने महिला सुसाईड बॉम्बरची भूमिका केली होती. 'दिल से' वर या चित्रपटाचा बराच प्रभाव आहे. संतोष सिवन हा 'दिल से'चा पण सिनेमॅटोग्राफर होता हा निव्वळ योगायोग नसावा. 'दिल से'सारखे आंधळ्या भक्तीचे फुगे फोडणारे चित्रपट वारंवार यायला हवेत. फार गरजेचं आहे ते आजच्या काळात.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget