![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raju Shetti : मुकादम व्यवस्था संपवा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, राजू शेट्टींची मागणी, 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
![Raju Shetti : मुकादम व्यवस्था संपवा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, राजू शेट्टींची मागणी, 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा Raju Shetti warning to the government on the issue of sugarcane farmers Raju Shetti : मुकादम व्यवस्था संपवा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, राजू शेट्टींची मागणी, 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/01/89d31edf1927a639d606894bd91f473b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raju Shetti : गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी (FRP) पेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावे. यावर्षी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, हंगाम संपल्यानंतर 350 रपये दिले जावेत, अशा विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देखील शेट्टींनी दिलाय. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यातील टाकळीमियाँ इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद संपन्न झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. दरम्यान, सरकारनं जर गांभिर्यानं लक्ष दिलं नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशाराही शेट्टींनी यावेळी दिला.
सात नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार
ऊस दराच्या मागणीसह साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर केलाय. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत. तसेच सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या सात नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शेट्टींनी यावेळी दिला आहे. सरकारनं गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय.
मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट, मुकादम व्यवस्था संपवावी
मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्यानं मुकादम व्यवस्था संपवावी. बांधकाम मजुरांप्रमाणं महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. त्यामुळं मुकादम व्यवस्था संपवावी अशी मागणी यावेळी राजू शेट्टींनी केली. साखरेच्या एफआरपीबाबत केंद्राकडून कोटा पद्धत लागू होवो अथवा काही होवो, मात्र शेतकऱ्यांचे पैसे द्या. केंद्राबरोबर काय भांडायच ते भांडा, आम्ही देखील सोबत येऊ असा टोला राजू शेट्टी यांनी विरोधकांना लागवला आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही. सत्ताधारी भांडणातच मशगुल आहेत. त्यामुळं आता शेचकऱ्यांनीचं ठरवाव, चोरांच्या मागे जावं की नाही अशी टीका राजू शेट्टींनी केली. गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल सरकारची एव्हढी असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा पाहतोय. सवंग लोकप्रियतेसाठी नुसत्या घोषणा सुरु आहेत. सरकारला लाज वाटली पाहीजे अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यांना काय सत्तेचा सारीपाट मांडायचा ते मांडू द्या. मात्र शेतकऱ्यांना आज संघर्षाची गरज आहे. त्या लढाईत मी उतरलो असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Raju Shetti : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा; राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)