तोंडचा घास हिरावला! बीडमध्ये केळीच्या बागेला भीषण आग, साडेपाच हजार झाडे जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
बीडच्या मोहखेड येथे केळीच्या बागेला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळं संपूर्ण केळीची बाग जळून खाक झाली आहे. चार एकरावर ही केळीची बाग होती.
Beed Bananas Fire News : बीडच्या मोहखेड येथे केळीच्या बागेला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळं संपूर्ण केळीची बाग जळून खाक झाली आहे. चार एकरावर ही केळीची बाग होती. तर काही दिवसात बागेतील केळी बाजारात पाठवली जाणार होती. मात्र आज दुपारी लागलेल्या आगीत बागेतील साडेपाच हजार केळीचे झाडे जळाले आहेत. त्यामुळं आधीच संकटात असलेल्या केळी उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळं ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग संपूर्ण केळीच्या बागेमध्ये पसरली
या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग संपूर्ण केळीच्या बागेमध्ये पसरली आहे. यावेळी आजुबाजुच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भर दुपारी आग लागल्याने आटोक्यात आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान प्रशासनाने या घटनेचा तात्काळ पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकरी रणधिर सोळंके यांनी केली आहे. दरम्यान, एकाच वेळी शेतकऱ्याची चार एकर केळीची संपूर्ण बाग जळून खाक झाल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या चार एकर बागेत साडेपाच हजार केळीची झाडे होती. या बागेतील सर्व केळी काही दिवसातच विक्रीसाठी बाजारात नेण्यात येणार होती. अशातच शॉर्टसर्किट झाल्यामुळं केळीच्या बागेला आग लागून शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरवला आहे. मोठा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळं तातडीने या जळालेल्या बागेचा सरकारनं पंचानामा करावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे, तसेच तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केली आहे.
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याच्या घरातील 18 क्विंटल कापूस आणि जीवन उपयोगी साहित्य जळून खाक
बीडच्या चिंचाळा इथं देखील आगीची भीषण घटना घडली आहे. या ठिकाणी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याच्या घरातील 18 क्विंटल कापूस आणि जीवन उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चिंचाळा येथील शेतकरी यशवंत कुलकर्णी यांच्या घरात शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. आग विझवण्याकरता परिसरातील लोकांनी अटोकाट प्रयत्न केले. परंतू, ही आग इतकी भीषण होती की या आगीने घरात ठेवलेला 18 क्विंटल कापूस संपूर्णपणे जळाला. यामुळं शेतकऱ्याचे अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. यासह घरातील साहित्यही जळाले. दरम्यान प्रशासनाने या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकरी कुटुंबाकडून करण्यात आली आहे.





















