Sharad Pawar & Ajit Pawar NCP: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक
NCP Party Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजितदादा गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. शरद पवारांचं या चर्चेला छेद देणारं वक्तव्य

Sharad Pawar and Ajit Pawar NCP: सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
तुम्ही निवडणुकीची काळजी करु नका. आपल्यासोबत जो येणार असेल, ते आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील तर त्यांचा विचार वरिष्ठ करतील. मी तुम्हाला विश्वास देतो. आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंताच करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला.
Sharad Pawar in Pune: पिंपरी चिंचवडमधील जुनी अनधिकृत बांधकाम टिकायला हवीत: शरद पवार
रांजणगावला ही आम्ही औद्योगिक नगरी बनवलं. चाकण, बारामती, इंदापूर, अशा अनेक ठिकाणी औद्योगिक पट्टा निर्माण केला. पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला हे औद्योगिक आणण्यासासाठी आम्ही झटलो. आज स्थिती वेगळी आहे. आता इथलं राजकारण, समाजकारण बदललं आहे. इथलं नेतृत्व अण्णासाहेब मगर, मग आम्ही, त्यानंतर रामकृष्ण मोरे यांनी या शहराचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट घेतले. यामागे गांधी-नेहरूंचे विचार महत्वाचे ठरले. त्यांनी विकासाची गंगा आणली अन हीच विकासाची गाडी आपल्याला पुढं न्यायची आहे. ( अजित पवारांचा उल्लेख टाळत चिमटा )
जी अनधिकृत बांधकाम आहेत, ती टिकायला हवीत. नव्यानं अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, पण जी पूर्वी झालीत ती टिकायला हवीत. रस्त्याच्या पलीकडे एक अन अलीकडे एक असा एक नवा व्यवसाय पिंपरी चिंचवडमध्ये सुरु झाला. हा व्यवसाय आपल्याला स्वच्छ करायचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधील प्रदुषणाबाबत शरद पवारांचं भाष्य
पिंपरी चिंचवड ही एक आगळी-वेगळी नगरी आहे. पूर्वी इथं फक्त शेती चालायची. 1960 साली यशवंतराव चव्हाणांसारखे नेतृत्व आलं, त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला. अण्णा साहेब मगर यांनी ही जबाबदारी स्वीकारली अन या नगरीचा कायापालट झाला. मुंबई ही आर्थिक राजधानी, तिथं वेगवेगळे कारखाने आले. मुंबई ही आर्थिक राजधानी व्हावी आणि औद्योगिककरण हे पुण्याच्या बाजूला जावं असा प्रस्ताव समोर आला. मग बजाज, टाटा अशा मोठ्या कंपन्या पिंपरी चिंचवडमध्ये आल्या. मग हळूहळू पिंपरी चिंचवड ही एक राज्यातील मोठी औद्योगिक नगरी झाली.
या शहरात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील संघटना दिसते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण पिढी इथं कष्ट करायला आली. त्या सर्वांच्या हाताला काम मिळालं. या सर्वांसाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले. माझ्याकडे जेव्हा राज्याची जबाबदारी होती, तेव्हा मी महत्वाचे निर्णय घेतले. आधी मुंबई हो उद्योगनगरी समजली जायची आणि पिंपरी चिंचवडला उद्योगनगरी म्हणून ओळखले जात. आता बघा चाकण एक छोटे गाव होते. आता त्याचा ही चेहरामोहरा बदलला आहे. मी हेलिकॉप्टरने जातो, तेव्हा नद्यांवर फेस दिसतो. हे कोणामुळं? हा प्रश्न मार्गी लावायला हवा. असे अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हे प्रश्न फक्त राष्ट्रवादी सोडवू शकते, असे शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
दादासोबत जाण्यास ताईही तयार?; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी मोठं विधान, म्हणाल्या, शरद पवारांनी मला...

























