Nitin Raut : यापुढे कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही,ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा इशारा
एकीकडे शेतकऱ्यांचं थकीत वीजबिल माफ करण्याची मागणी जोर धऱत असताना आता ऊर्जामंत्र्यांनी मात्र वीज बिल वसुलीसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे कुणालाही फुकट वीज देणार नाही. वीज वापरायची असल्यास पैसे मोजावेच लागतील असं ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी स्पष्ट केलंय. औरंगाबादेत शेतकरी वीजबिल प्रश्नावरुन भाजप आमदार प्रशांत बंब आणि हरीभाऊ बागडेंनी राऊतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून थकीत वीजबिल वसुली करु नये, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. त्यावर, वीज फुकट देत बसलो तर महावितरणच बंद पडेल अशी भूमिका राऊतांनी मांडली. तर तिकडे शेतकऱ्यांवर वीजबिलाच्या थकबाकीचा भार टाकला तर आम्ही मोर्चा काढू आणि मग राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा बंब यांनी दिलंय.






















