Mumbai Potholes : खड्डा...भ्रष्टाचाराचा अड्डा; 713 कोटींचा अपघातांचा मानखुर्द-घाटकोपर उड्डाणपूल
मुंबईतली खड्ड्यांची मालिका मुंबईकरांना नवी राहिलेली नाही. आता खड्ड्यांचे प्रश्न दरवर्षीचेच झाल्यानं खड्डे आऊटडेटेड ठरतायेत. सध्या चलती आहे ती नव्यानंच जन्माला येऊन मुंबईकरांना तोंडावर पाडणाऱ्या रस्त्यांची, वेशीजवळचं कांजुर, मुंबईतलं मानखुर्द, आणि ठाण्यातली कोपरी इथल्या रस्त्यांचा महीमा दूरदूरवर पोहोचलाय. याच रस्त्यांची एक झलक तुम्हांलाही दाखवतोय.
वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग म्हणजेच घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावर वाहने घसरून अपघात होत असल्याने या उड्डाणपूलाचा दुरुस्ती करण्यात आली.या पुलाचे काम पाच वर्षे रखडले होते आणि त्यातच या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता.तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पुलाच्या उदघाटन प्रसंगी हा रस्ता समतल नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. इथे झालेल्या विविध अपघातात एक तरुणाचा मृत्यू, एक जखमी तर अनेक वाहनांचे नुकसान झाले. या पुलावर काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी डांबर वापरण्यात आले आहे.तर या मार्गावर अवजड वाहनांना ही बंदी आहे.त्यामुळे हा पूल अवजड वाहनांचे ओझे उचलू शकत नाही का असा प्रश्न विचारला जात होता.त्यातच ज्या ठिकाणी डांबर आहे तिथे ऑइल सदृश पदार्थ बाहेर येऊ लागला आणि त्यात पाऊस यामुळे अनेक वाहने इथे घसरून अपघात होऊ लागले. वाहनांचा वेग नियंत्रित करण्याकरिता पुलाच्या दोन्ही बाजुने दर ५०० मीटर अंतरावर गतिरोधक बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, गतिरोधक दर्शक फलक बसविणे, डांबराच्या पृष्ठभागावर मास्टिक अस्फाल्ट वापरून वाहने घसरू नये, यासाठी सदर पृष्ठभाग खरबडीत करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसविणे या उपाययोजना करण्यात आल्याा..