Belgaum | बेळगावच्या मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, पुतळा पुन्हा न बसवल्यास आंदोलनाचा इशारा
कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेने कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.
























